मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल १८०० कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला, या प्रकरणामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. या प्रकरणात सतत होणाऱ्या आरोपांनंतर हा जमीन व्यवहार रद्द करण्यात आल्याचे अजित पवार यांनी जाहीर करुन टाकले. आत्तापर्यंत या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. अमोडिया कंपनीत पार्थ पवारचे ९९ टक्के शेअर्स आहे तर १ टक्के शेअर्स दिग्विजय पाटील याचा आहे. पार्थ पवारवर या प्रकरणात अजूनही गुन्हा दाखल झाला नाही पण 1 टक्का शेअर्स असलेल्या दिग्विजय पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांच्यावर ही टीका करण्यात येत आहे.
असे असताना शनिवारी राष्ट्रवादी काँग्रसे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारवर अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही अशी विचारणा केली. तर अजित पवारांनी मुलं मोठी झाली आहेत आणि ते त्यांची व्यवसाय करतात असे त्यांनी म्हटले. आता आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच पार्थ पवार याच्या जमीन घोटाळा प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, चूक केली असेल तर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, पण ती कारवाई करताना कुठेही भेदभाव होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. पण हे सरकार आम्ही जेव्हा काही प्रकरणं पुढे आणतो तेव्हा, मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा व्यक्ती असेल तर त्याबाबत कारवाई होत नाही. पण कुठे मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला एखाद्या नेत्याचा गेम करायचा असेल तर त्याच्यावर लगेच कारवाई होते. आम्ही सिडको प्रकरण पुढे आणले. त्याप्रकरणात सरकारच्या एका विभागाने सांगूनही संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही. पण पुणे जमीन घोटाळा प्रकरणात सुपरफास्ट कारवाई केली जाते. आमचं मत आहे, भेदभाव न करता कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिक रोहित पवारांनी स्पष्ट केली आहे.
काही अवैध करत असाल तर त्याची शहानिशा झाली पाहीजे
रोहित पवार पुढे म्हणाले जर तुम्ही कुठली गोष्ट अवैध करत असाल, मग तुम्ही सत्तेतल्या नेत्यांच्या नातेवाईक असूद्यात विरोधातील नेत्यांचे नातेवाईक असूद्यात, नाहीतर व्यावसायिक असूदेत किंवा तुमचे सरकार सोबत कुठेही देणे घेणे नाही, जर तुम्ही काही अवैध करत असाल तर तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याबाबतीतली शहानिशा झाली पाहिजे. काय खरे आणि काय खोटे हे लोकांसमोर आले पाहिजे, पण हे बघत असताना चैन काय आहे, कारण कोणताही निर्णय एक व्यक्ती घेत नसतो, त्याला पाठिंबा देणार काही अधिकारी असतात. ते अधिकारी कोण, कशा पद्धतीने ते वागतात, अधिकारी काही लोकांना महत्त्व देतात.
मुख्यमंत्र्यांच्या जवळचा व्यक्ती असेल तर कारवाई होत नाही
काहीच लोकांचे काम तिथं का केली जातात. गरीबाची कामाची तर का होत नाहीत. या सगळ्या गोष्टींची शहानिशा करणार अतिशय महत्त्वाचे आहे. हे सगळे करत असताना आमच्या एकच मत आहे कुठलाही नेता असूद्या किंवा त्याच्या परिवारातील कोणताही व्यक्ती असूद्या चूक केली असेल तर ती चूक समजून योग्य पद्धतीची कारवाई झाली पाहिजे, पण ती कारवाई होत असताना भेदभाव कुठे झाला नाही पाहिजे, याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे, पण या सरकारमध्ये आपण जर पाहिले तर जेव्हा केव्हा आम्ही काही मुद्दे घेऊन पुढे जात असतो मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या तो व्यक्ती असेल त्याबाबतीत कुठे कारवाई होत नाही.
पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मला एकच सांगायचे आहे, ज्या काही सरकारी जमिनी आणि कुळाच्या जमिनी आहेत किंवा इतर काही विषय आहेत ज्या कोणाच्या नावाने जमिनी होत नाहीत, अशा जमिनीचा ताबा ज्या-ज्या लोकांनी घेतलेला आहे, त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी लक्ष घातलेले आहे त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. आणखी एक गोष्ट ज्या ठिकाणी मुंबईत भाजपने आपले कार्यालय केला आहे, त्याबाबतीत सुद्धा आपण स्पष्टीकरण दिले पाहिजे. कुठल्याही सरकारची जमीन कुठल्याही पार्टीला किंवा कोणत्याही नेत्याच्या घशात किंवा त्याच्या परिवाराच्या हातामध्ये दिल्या गेल्या नाही पाहिजे, अशी भूमिका आमच्या सर्वांची आहे, असेही रोहित पवार पुढे म्हणालेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





