नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायती मधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढून घोषणा मंत्रालयात करण्यात आली. यामध्ये नेवासा नगरपंचायत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण (खुल्या) प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने नेवासा शहरातील सर्व नागरिक नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी पात्र आहेत. शिवाय पहिल्यांदाच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने प्रत्येक पक्ष, आघाडीत या पदाच्या उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा राहणार आहे.
आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची राजकीय कार्यकर्ते, इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. नेवासा नगराध्यक्षपद सर्वांसाठी खुले जाहीर झाल्याने ईच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. नेवासा नगरपंचायत घोषित झाल्यानंतर 2017 रोजी नगरपंचायतीची निवडणूक होऊन भाजपाचे 17 उमेदवारांपैकी 6 नगरसेवक निवडुन आले होते. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे 9 नगरसेवक निवडून आले होते. एक अपक्ष व एक काँग्रेस असे 17 नगरसेवक निवडून आले होते.
केवळ नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातुन भारतीय जनता पार्टीच्या संगिता दत्तात्रय बर्डे विजयी झाल्याने नेवाशाच्या पहिल्या नगराध्यक्षा पदी विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांनी अडीच वर्ष कारभार केला. त्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने माजी आमदार शंकरराव गडाख गटाच्या योगिता सतिश पिंपळे या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या .
2022 साली नगरपंचायत नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. 2022 मध्ये नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमास सुरुवात झाली होती. मात्र प्रभाग रचना झाली नव्हती. आता नगरपंचायतच्या 2025 मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रमानुसार प्रभाग रचनेनंतर आता नगराध्यक्ष आरक्षण सोडत होऊन नगराध्यक्ष पद सर्वसाधारण साखठी जाहीर झाल्याने सोमवारी दुपारनंतर सोशल मीडियावर इच्छुक ‘भावी नगराध्यक्षां’च्या पोस्ट व्हायरल होत असून शहरात राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्ष निवड जनतेतून असल्याने नगराध्यक्ष व नगरसेवक अशा दोन व्यक्तींना नागरीकांना दोन मते द्यावे लागणार आहेत.
उमेदवार निवड सर्वच पक्षांसाठी कठीण
नेवासा ग्रामपंचायतची नगरपंचायत बनल्यानंतरची ही दुसरी निवडणूक आहे. 2017 च्या निवडणुकीत अडीच-अडीच वर्षे अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला नगरसेविकांना नगराध्यक्ष पदाचा मान मिळाला. यावेळी नगराध्यक्षपद थेट जनतेतून व सर्वांसाठी पूर्ण पाच वर्षे खुले आहे. भाजप, शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे गट), आम आदमी पार्टी, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, प्रहार जनशक्ती या पक्षांबरोबरच शहरवासीयांशी चांगला संपर्क असलेले अपक्षही निवडणूक रिंगणात उतरू शकतात. मोठ्या संख्येेने असलेल्या इच्छुकांतून उमेदवार म्हणून कोणाला निवडावे हा सर्वच राजकीय पक्षांसमोर मोठा प्रश्न उभा राहणार आहे.
नगरपंचायतीची 2016-17 मध्ये तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत 2025 च्या नगरपंचायत निवडणुकीत बदल झाला असून इच्छुक उमेदवारांची यामुळे 2016-17 रचनेनुसार केलेली निवडणुकीची तयारी त्यांना नवीन प्रभाग रचनेनुसार करावी लागणार आहे.




