Saturday, July 27, 2024
Homeनगर30 ऑक्टोबरला निळवंडेच्या उजव्या कालव्यातून पाणी

30 ऑक्टोबरला निळवंडेच्या उजव्या कालव्यातून पाणी

अकोले |प्रतिनिधी| Akole

निळवंडे धरणातील पाण्यावर अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांचा असलेला हक्क आणि अधिकार आबाधित ठेवूनच सर्व निर्णय होतील. त्यामुळे पाण्याबाबतची कोणतीही भीती बाळगू नका, असे आश्वासित करून डाव्या कालव्याप्रमाणेच उजव्या कालव्यांची तांत्रिक कामे पूर्ण करून येत्या 30 ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्याची घोषणा महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

- Advertisement -

निळवंडे धरणातून डाव्या कालव्यात शनिवारी पाणी सोडण्याची घोषणा ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांनी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी पूर्ण करावी, आशी मागणी करत धरण स्थळावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मंत्री विखे पाटील यांनी धरणस्थळावर येताच थेट आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांमध्ये जावून त्यांची भूमिका समाजावून घेतली. माजी आमदार वैभव पिचड, डॉ. अशोकराव इथापे, कॉ. डॉ. अजित नवले, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, अ‍ॅड. वसंतराव मनकर, शिवाजीराव धुमाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिल दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, अगस्ति कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती सुनिताताई भांगरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अगस्ती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक पर्बतराव नाईकवाडी, प्रदीप हासे, अमृतसागर दूध संघाचे संचालक आनंदराव वाकचौरे, आप्पासाहेब आवारी, जगन देशमुख, मधुकर तळपाडे, बाळासाहेब आवारी, सुनिता भांगरे, निता आवारी, सुरेश भिसे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख यांच्यासह शेतकरी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना.विखे पाटील म्हणाले, उजव्या कालव्यांची बहुतांशी कामे पूर्ण झालेली आहेत. राहिलेली तांत्रिक काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना देतो. अधिकची मशिनरी उपलब्ध करून काम पूर्ण करून 30 ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्यास मी स्वतः येईल, डाव्या कालव्याला पाणी सोडल्याने उजव्या कालव्याच्या चाचणीला पाणी शिल्लक राहाणार नाही. ही भीती मनातून काढून टाका, चुकीची माहिती समोर आली असून आकडेवारीसह ना. विखे यांनी खुलासा केला.

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रांताधिकारी तसेच जलसंपदा विभागाने तातडीने प्रयत्न करावेत. यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांचा तातडीने पाठपुरावा करण्याच्या सूचना ना. विखे पाटील यांनी अधिकार्‍यांना दिल्या. शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर भूसंपादनाचे अजूनही असलेले शेरे कमी करून देण्याबाबतची कार्यवाही तहसिलदारांनी तात्काळ पूर्ण करण्यास तसेच तालुक्यातील आणेवारी बाबतही पुन्हा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी प्रांताधिकारी यांना दिल्या.

यासर्व प्रश्नाबाबत पुढील आठवड्यात बैठक घेवून आढावा घेणार तसेच उजव्या कालव्यांची सुरू असलेली कामे पाहाण्यासाठी स्वतः येणार याबाबत सकारात्मक चर्चा करून ना. विखे पाटील यांंनी आंदोलनकर्त्यांचे समाधान केले.

ना. विखे पाटील म्हणाले की,समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे नगर-नाशिक आणि मराठवाड्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे.

डॉ.अजित नवले यांनी ना.विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनावर समाधान व्यक्त करून अकोले तालुक्यातील प्रश्नसाठी पालकत्व स्विकारण्याची विनंती केली. ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, श्रीमती सुनिताताई भांगरे, वसंतराव मनकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे अभियंता बाळासाहेब शेटे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या