Saturday, July 27, 2024
Homeनाशिकनिफाडच्या कांद्याची बांगलादेश वारी

निफाडच्या कांद्याची बांगलादेश वारी

निफाड । प्रतिनिधी Niphad

नाफेडतर्फे महाराष्ट्रात ७५ हजार टन कांद्याची खरेदी केली जाणार असून त्यापैकी ४४ हजार टन कांद्याची खरेदी झाली आहे. या महिनाअखेरपर्यंत नाफेड कांद्याची खरेदी करणार असून पहिल्यांदाच निफाडचा कांदा रेल्वेद्वारे बांगलादेशात पोहोचला आहे.स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे भाव कोसळल्याच्या मुद्यावर राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सोशल मीडियातून आंदोलन छेडले होते. परिणामी बाजार समितीमध्ये नाफेडकडून खरेदी केलेल्या कांद्याचे भावदेखील दररोज जाहीर करावे, अशी मागणीही कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली होती.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा बांगलादेशामध्ये निर्यात होतो. मात्र निर्यातबंदीमुळे मागणी व पुरवठा साखळी बिघडली. पुढे निर्यातबंदी उठली, पण करोनामुळे रस्ते वाहतुकीत बांगलादेशात माल जाण्यापूर्वी स्थानिक पश्चिम बंगाल सरकारचा विरोध झाल्याने अडचणी आल्या. आता विशेष रेल्वेद्वारे थेट बांगलादेशात कांदा निर्यातीची परवानगी मिळाल्याने पहिल्यांदाच रेल्वेद्वारे एक हजार ६०० टन कांद्याची निर्यात झाली आहे. संचारबंदी काळात केंद्र शासनाने कांदा निर्यातीला परवानगी दिली. मात्र बंगाल सरकारने हरकत घेतल्याने हे काम अडचणीत होते. त्यामुळे बांगलादेश सीमेवरील मेहंदीपूर, गोजुडांगा, बनगाव ही व्यापारी केंद्रे बंद असल्याने कांदा पोहोचू शकला नव्हता. आता बांगलादेशातील स्थानिक कांदा संपला आहे.

तसेच बंगालमधील सुखसागर येथील कांदा स्थानिक ठिकाणी वितरीत होत असल्याने मागणी वाढली आहे. आता वाहतुकीची अडचण मिटल्याने निर्यातदारांमध्ये संतोषाचे वातावरण आहे. यावर्षी मे व जून महिन्यात रस्ते व रेल्वेच्या माध्यमातून जवळपास दीड लाख टनांवर कांदा निर्यात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारत-बांगलादेश सरकारच्या माध्यमातून विशेष परवानगीने काही निर्यातदारांनी मका, डाळ निर्यात केली होती. त्यानंतर शेतमाल वाहतुकीसाठी पाठपुरावा केल्यानंतर व्यापारवृद्धीसाठी येथील बेनापोल-पेत्रपोल रेल्वे लिंकद्वारे कंटेनर ट्रेन सर्व्हिस सुरू करण्यास बांगलादेशाने मंजुरी दिली आहे. आतापर्यंत रेल्वेद्वारे कांदा मालदा येथे उतरवून तो बांगलादेशमध्ये जायचा. आता थेट बांगलादेशात रेल्वेची सुविधा झाल्याने कामाला गती आली आहे.

नफाड, खेरवाडी, लासलगाव, मनमाड, येवला, नगरसूल येथून आपला कांदा कमी खर्चात थेट बांगलादेशात जाणार आहे. त्याचा फायदा थेट शेतकर्‍यांना होणार आहे. जिल्ह्यात रेल्वेची मागणी वाढत जाणार आहे. हा पर्याय सोपा आहे. आता थेट पर्याय उपलब्ध झाल्याने कामात सुलभता येईल.

दीपक भुतडा, कांदा निर्यातदार (निफाड)

- Advertisment -

ताज्या बातम्या