मुंबई | Mumbai
नाशिकमध्ये २०२६ मध्ये सुरु होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणात तयारी सुरु झाली आहे. शहरातील तपोवन येथे साधू-महंतांसाठी ११५० एकरांवर भव्य साधूग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास तपोवनातील १८०० झाडे तोडली जाणार आहेत. या निर्णयामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड संताप वक्त केला जात आहे. वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमींसह सेलिब्रिटी देखील रस्त्यावर उतरले आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील वृक्ष तोडीला विरोध दर्शवला आहे. मात्र, आता तपोवन वृक्षतोडीसंदर्भात भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवला आहे.
नितेश राणे काय म्हणाले?
नितेश राणे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव? असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा तापलेला असतानाच नितेश राणे यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
महायुतीतील घटकपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी राणेंचे हे विधान त्यांचे ‘वैयक्तिक मत’ असल्याचे म्हटले. तसेच, हिंदुत्व आणि झाडे याचा कुठेही संबंध लागत नाही,’ असे स्पष्ट केले. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील नितेश राणेंवर निशाणा साधला.
किशोरी पेडणेकरांचा नितेश राणेंवर निशाणा
शिवसेना उबाठाच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाले की, “बकरीच्या वेळेला झाड तोडली जात नाहीत. एखादे झाड हे मुळापासून तोडणे आणि झाडावरची पालापाचोळा तोडणे, हे दोन भिन्न भिन्न गोष्टी आहेत.” असे म्हणत त्यांनी नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला.
आपले मंत्रीपद आणि राजकारण टिकण्यासाठी बेजबाबदार वक्तव्य
नितेश राणे यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत आपण काय करतो आहे, काय करत नाही, पुढची पिढी आपल्यास काय म्हणेल? याचा विचार न करता मंत्रिपदावर बसून असे बेजबाबदार वक्तव्य करणे शोभते का? आपले मंत्रिपद आणि आपले राजकारण टिकणे यासाठीच ते असे करतात. तपोवनमधील झाड तोडण्याला कोणी समर्थन करत असेल तर त्याला पुढच्या पिढीची काळजी नाही. त्याला फक्त धर्माच्या नावावर राजकारण करायचे आहे. यापूर्वी नाशिकमध्ये कुंभमेळा झाला नाही का? शेकडे वर्षापासून नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे. तेव्हा झाड तोडण्याची गरज पडली नाही. मग आत्ताच का झाड तोडत आहात? असा सवाल उपस्थित करत त्यांनी नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल केलाय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




