नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा ते सरकारलाही कानपिचक्या दिल्याचे आपण पाहिले आहे. शिवाय त्यांच्या कामाचा आवाका मोठा असल्याने नितीन गडकरी यांच्या कामाबद्दल चर्चाही होत असते. त्यामुळेच नितीन गडकरी यांनी लोकसभेत जाहीरपणे चूक कबुल केली. बहुप्रतीक्षित मुंबई गोवा महामार्ग कधी सुरू होणार याची सगळेच कोकणवासीय तसेच, मुंबईकरही मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. याबद्दल लोकसभेत नितीन गडकरींनी माहिती दिली आहे.
विषय होता मुंबई गोवा महामार्गाचा आणि या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गासाठी नवी डेडलाइन दिलीच तसेच चूक कबुल केली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होईल, असा सवाल केला. या महामार्गासाठी चांद्रयान मोहिमेपेक्षा जास्त खर्च करूनही महामार्ग अपूर्ण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या प्रश्नाला नितीन गडकरी यांनी उत्तर दिले. २००९ पासून मुंबई महामार्गाचा प्रकल्प रेंगाळला आहे. मात्र, आता 89 टक्के काम पूर्ण झाले असून एप्रिल २०२६ पूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती गडकरी यांनी सभागृहात दिली.
खासदार अरविंद सावंत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गा प्रकल्प २००९ पासून प्रकल्प रेंगाळला आहे. यात जमीन संपादनाचा मुख्य अडथळा होता. अनेक कंत्राटदार बदलण्यात आले, अनेकांवर कारवाई झाली. आतापर्यंत ८९ टक्के काम झाले झाले असून एप्रिल २०२६ पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे गडकरी म्हणाले. त्याचवेळी प्रकल्प खूप रेंगाळला आहे हे मान्य करतो, असे म्हणत गडकरींनी चूक कबुल केली.
‘मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या १० वर्षांपासून सुरू आहेच. चंद्रावर जाण्यासाठी जितका खर्च झाला नाही त्यापेक्षा जास्त खर्च या महामार्गासाठी झाला आहे. तरीही आजपर्यंत हा रस्ता पूर्ण झालेला नाही. त्यामुळे रस्त्याच्या या कामात तुम्ही वैयक्तिरित्या लक्ष घातल तरच काम होईल. गेल्या कित्येक वर्षांपासून काम सुरू आहे त्यामुळे नागरिकही आता वैतागले आहेत. हे काम पूर्ण कधी होणार?’ असा प्रश्न खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत गडकरींना केला होता.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





