अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून नाशिक परिक्षेत्रातील विविध जिल्ह्यांमध्ये बदली झालेले काही पोलीस अधिकारी पुन्हा एकदा जिल्ह्यात दाखल झाले आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या ‘आशिर्वादाने’ ही पुनर्बदली झाल्याची चर्चा पोलीस दलात सुरू असून, त्यामुळे काही अधिकार्यांचा अहिल्यानगर जिल्ह्याशी ‘जीव गुंतल्यासारखा’ संबंध निर्माण झाल्याचे चित्र आहे.
निवडणुकीपूर्वी ज्या पोलीस अधिकार्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला होता, त्यांची बदली जिल्ह्याबाहेर करण्यात आली होती. मात्र, आता त्यांचे पुनरागमन झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या अधिकार्यांमध्ये पोलीस निरीक्षक विलास पुजारी, ज्योती गडकरी, सोपान शिरसाठ, सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, सोमनाथ दिवटे, महिला सहायक निरीक्षक पल्लवी देशमुख आदींचा समावेश आहे. निरीक्षक विलास पुजारी हे शेवगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी असताना वादग्रस्त ठरले होते. त्यांनी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यावर दंगलीचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याचबरोबर वाळू चोरीप्रकरणी दुसर्या राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यावर गुन्हा दाखल करून पुजारी चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली होती.
तेथून ते जिल्ह्याबाहेर बदलून गेले होते. आता पुन्हा ते जिल्ह्यात आले असून सध्या त्यांच्याकडे घारगाव पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आलेला आहे. तसेच पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीपूर्वी बदली करण्यात आली होती. सध्या त्या नियंत्रण कक्षात आहेत व पुन्हा पोलीस ठाण्याचे प्रभारीपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यांना याआधी तोफखाना व सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले होते. तरी देखील त्या पुन्हा जिल्ह्यात येऊन पोलीस ठाणे मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
निरीक्षक सोपान शिरसाठ, सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, शिशिरकुमार देशमुख व पल्लवी देशमुख यांचीही निवडणुकीपूर्वी जिल्ह्याबाहेर बदली झाली होती. आता हे सर्व अधिकारी पुन्हा नगर जिल्ह्यात आले आहेत. शिशिरकुमार देशमुख यांनी यापूर्वी एलसीबी, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे केले आहेत. तर पल्लवी देशमुख यांनी भरोसा सेलचा कार्यभार संभाळला आहे. दिवटे यांना सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारीपद देण्यात आले आहे. एकूणच, निवडणुकीपूर्वी बदली झालेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या अधिकार्यांचे पुन्हा जिल्ह्यात आगमन झाल्यामुळे पोलीस प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस दलात यासंबंधी तीव्र चर्चा सुरू असून, वरिष्ठ अधिकार्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एपीआय देशमुख वादग्रस्त
जिल्ह्यात नुकतेच बदलून आलेले सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी असताना एका संशयित आरोपीचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला होता. मात्र, तात्कालीन पोलीस अधीक्षकांसोबत असलेल्या खास संबंधामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. तसेच त्यांच्या कार्यकाळात एका पोलीस अंमलदाराने त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा देशमुख जिल्ह्यात बदलून आले आहे. त्यांना एखाद्या पोलीस ठाण्याचे प्रभारी केल्यास ते वादग्रस्त ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वादग्रस्त ठरले अन् नगरला आले
चाळीसगाव (जि. जळगाव) पोलीस ठाण्यातील एका अंमलदाराच्या लाचखोरीप्रकरणात तत्कालीन प्रभारी किरणकुमार कबाडी वादग्रस्त ठरले आहेत. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पोलीस ठाण्यातील ठिय्यानंतर त्यांची बदली नियंत्रण कक्षात झाली होती. आता महानिरीक्षक कराळे यांनी त्यांची बदली थेट अहिल्यानगर जिल्ह्यात केली आहे. ते सध्या नियंत्रण कक्षात हजर झाले आहेत.
सोळुंके यांना कार्यमुक्ती नाहीच!
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांची बदली जिल्ह्याबाहेर झाली असली तरी ते अजूनही श्रीरामपूर ठाण्यातच कार्यरत आहेत. त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. ते पोलीस खात्यात उपनिरीक्षक म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांचा प्रशिक्षणार्थी व नंतर नियुक्तीचा कालावधी तोफखाना पोलीस ठाण्यात गेला. त्यानंतर त्यांची बदली श्रीरामपूर ठाण्यात करण्यात आली. जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाला, बदली झाली तरी देखील त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.