जगात सर्वात मोठी करोनाप्रतिबंधक लसीकरण मोहीम भारतात राबवली जात आहे. परंतु काही भागात लसीकरण संथगतीने सुरू असल्याचे केंद्र सरकारच्या लक्षात आले आहे. देशवासीय दीपोत्सवात मग्न असताना पंतप्रधानांनी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि चाळीस जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्यांची आढाव्यासाठी आभासी बैठक नुकतीच घेतली. लसीकरणाच्या संथपणाबद्दल चिंता व्यक्त केली. चिंता व्यक्त करून न थांबता लसीकरणाला वेग यावा म्हणून चाळीस जिल्ह्यांसाठी ङ्गहर घर दस्तकफ मोहीम राबवण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला.
लसीकरण संथगतीने सुरू असलेल्या जिल्ह्यांत महाराष्ट्रासह झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांतील जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे. महाराष्ट्राचेही सहा जिल्हे आहेत. या जिल्ह्यांतील पन्नास टक्के लोकांनी अजून पहिली लससुद्धा घेतलेली नाही. दुसर्या मात्रेची गतीही खूप कमी आहे. ज्या घराला लशीच्या दोन्ही मात्रांचे सुरक्षाकवच लाभलेले नाही, अशा प्रत्येक घराचे दार ङ्गहर घर दस्तकफ या नवमंत्राने ठोठावले जाईल. ङ्गप्रत्येक घरी लस, घरोघरी लसफ या भावनेसह घरोघर पोहोचवायचा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला. विदेश दौर्यावर असतानासुद्धा मायदेशातील लसीकरणाबाबत पंतप्रधान चिंताग्रस्त असावेत. तेथून परतल्यानंतर त्यांनी तातडीने घेतलेल्या बैठकीतून ते सूचित होते.
करोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. मात्र प्रत्येकाने दोन लसमात्रा घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी म्हटले आहे. करोनाचा धुमाकूळ सुरू असताना लस घेण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसला. भल्या सकाळी नागरिकांच्या मोठमोठ्या रांगा लागत. लसटंचाईकाळात लस मिळवण्यासाठी लोकांची त्याकाळी चढाओढ सुरू होती. लसीकरण केेंद्रांवरील सेवक आणि नागरिक यांच्या वादविवादाचे प्रसंगही उद्भवले होते. करोना लाट आणि संसर्ग ओसरल्यावर नागरिक काहीसे निर्धास्त बनले असावेत.
आता धोका टळला या समजाने गर्दी करायला आणि गर्दीत जायला निर्भीड बनले असावेत. दुसरी लस घेण्याची आता गरजच उरलेली नाही, असेही अनेकांना वाटत असेल. पंतप्रधानांना वाटते तितकी काळजी लोकांना वाटत नसावी. कदाचित बेरोजगारी, इंधनदरवाढ अशा महत्त्वाच्या प्रश्नांकडून लोकांचे लक्ष वळवावे या उद्देशाने पंतप्रधानांची लसीकरणाबद्दलची आस्था अधिक प्रखर बनत असावी हेही काहींना वाटू शकते.
त्यामुळे दुसर्या लशीकडे अनेकांनी पाठ फिरवली असेल. म्हणून कदाचित लसीकरण प्रक्रिया मंदावलेली दिसते. महाराष्ट्रातील तेवीस जिल्ह्यांत आतापर्यंत बत्तीस टक्क्यांपर्यंत लसीकरण पूर्ण झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसते. लसीकरणाबाबतची लोकांमधील उदासीनता करोना संसर्गवाढीला आमंत्रण देणारी ठरू शकते, अशी भीती वैद्यकीय तज्ञ व्यक्त करीत आहेत. मध्यंतरीच्या काळात देशभर लसटंचाई निर्माण झाली होती.
लसपुरवठा कमी होत असल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये संघर्ष सुरू झाला होता. जास्तीत जास्त लसीकरण व्हावे हीच त्यामागे राज्यांची भूमिका होती, पण केंद्र सरकारला त्यावेळी ती रूचली नव्हती. आता सर्वत्र लशींचा सुकाळ झाला आहे. केंद्रांवरील गर्दी ओसरली आहे. मात्र लसीकरण पूर्ण झाल्याने नव्हे तर लशीची गरजच उरली नसल्याची मानसिकता लोकांमध्ये बळावत असल्याने कदाचित तसे झाले असेल. शंभर कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा देशाने नुकताच गाठला, पण या कामगिरीचे श्रेय कोणा एकाला देता येणार नाही.
यामागे सामूहिक प्रयत्न आणि परिश्रम दडलेले आहेत. राज्यांनी साथ दिली नसती तर केंद्र सरकारने कितीही ठरवले असते तरी लसीकरणाची मोहीम पुढे नेणे शक्य झाले नसते. तथापि या सगळ्याच गोष्टींचे श्रेय एककेंद्री बनवण्याच्या प्रयत्नातूनही कदाचित लोकांची मानसिकता बेफिकिरीकडे झुकत असेल.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणातील उणिवा नजरेस आणल्या आहेत. आरोग्य सुरक्षेची बाब म्हणून प्रत्येकाने लसीकरणाकडे पाहिले पाहिजे. शंभर कोटी लसीकरणांचा विक्रम प्रस्थापित केल्यानंतर आता दोनशे कोटी लसीकरणावर केंद्र सरकारचे लक्ष असेल तर नवल नाही. शंभर कोटी लसीकरणाची जाहिरातबाजीसुद्धा अनेकांना अतिशयोक्त वाटत आहे. प्रत्यक्षात लसीकरण झालेल्या लोकांची संख्या 23 कोटींपेक्षा नसावी, असाही आक्षेप घेतला जात आहे.
लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. तसे झाले तरच लसीकरणातील आणखी एका मोठ्या विक्रमाचे स्वप्न पुरे होऊ शकेल.