पाचेगाव फाटा |वार्ताहर| Pachegav Phata
अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकर्यांचा कांदा हा मार्च महिन्यात निघाला. त्यात सुरवातीला शेतकर्यांच्या शेतात 10 ते 11 रुपये दर मिळत होता. तर मार्केटमध्ये साधारण पंधरा रुपये दर मिळाला. त्यामुळे थोड्याफार शेतकर्यांनी कांदा विकला व उर्वरित शेतकर्यांनी आपला कांदा चाळीत बंदिस्त करून ठेवला. पण तीन महिने उलटून देखील अपेक्षित प्रमाणे कांद्याला चांगला दर मिळत नसल्याने आता शेतकरी धास्तावले आहेत.
कारण ज्या भागात म्हणजे कर्नाटक, बंगलोर व हैदराबाद या भागातून महाराष्ट्रातील कांद्याला चांगली मागणी असते, पण त्यांच्याकडे देखील आता लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे निश्चितच आपल्या महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी होणार आहे.त्यामुळे मागणी कमी झाली म्हणजे दर निश्चितच कमी होणार आहे. यात शेतकर्यांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये 35 ते 40 टक्के कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यात कर्नाटकात मध्ये कमी पाऊस पडला तर अजून लाल कांदा मार्केट मध्ये येऊन महाराष्ट्रातील कांद्याला भाव कमी मिळू शकतो असे काही कांदा अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे. पण वरील राज्यात जर पावसाचे प्रमाण अधिक राहिले तर तेथील कांदा उत्पादनात घट येऊ शकते. पावसाचे प्रमाण जास्त राहिले तर निश्चितच महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढून दारात मोठी उसळी देखील येऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे.
भाव वाढण्याच्या अपेक्षेने शेतकर्यांनी कांदा जरी चाळीत बंदिस्त केला असला तरी त्यात सुरुवातीला उन्हाळ्याच्या झळा, त्यानंतर अवकाळी पाऊस त्यानंतर उन्ह व अति गारवा यामुळे कांदा लवकर खराब होत आहे. त्यात जवळपास तीन महिने उलटून देखील दर वाढण्याऐवजी कमी होत आहे.त्यात साठवलेला कांद्यामध्ये देखील घट झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांची कोंडी निर्माण झाली आहे. कांदा ठेवला तर खराब होण्याची भीती व मार्केट मध्ये विकला तर भाव कमी त्यामुळे काय निर्णय घ्यावा असा प्रश्न आता शेतकर्यांना पडला आहे.
ज्या वेळेस महाराष्ट्रातील कांद्याला मागणी असते तेव्हा केंद्र शासन निर्यात धोरण शुल्क उठवली जात नाही, त्यामुळे कांद्याचे भाव वाढले जात नाही.नाफेड कांदा खरेदी करणार पण मग कधी? कारण जून महिन्यातच नाफेड मार्फत शेतकर्यांचा कांदा खरेदी केला जाईल असे सांगितले जात होते. पण जून संपवून गेलं व जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी देखील नाफेड खरेदी सुरू झाली नाही. त्यामुळे कांदा खराब होत असल्याकारणाने शेतकरी कांदा मार्केटमध्ये आणत आहे. त्यातच कांद्याची आवक वाढली व भावात मोठी घसरण दिसून येत आहे.
कांद्याचे भाव जून महिन्यात जवळपास 17 ते 18 रुपये पर्यंत गेले होते. भाव वाढत आहे असा अंदाज शेतकर्यांनी बांधला. थोड्याफार शेतकर्यांनी आहे ते दर पदरात पाडून घेतले.पण आता कांदा दर 18 रुपये वरून 12 रुपये पर्यन्त आल्याने शेतकर्यांना पुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.त्यात काही कांद्यालाच हा दर मिळत आहे.जवळपास सहा रुपयाने दर कमी झाल्याने आर्थिक दृष्ट्या नुकसान देखील होत आहे.कारण सगळ्यात खर्चिक पीक म्हणून कांदा पिकांकडे पाही जाते.त्यात भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
त्यामुळे शेतकर्यांनी निर्यात धोरणावर अनुदानित तत्त्वावर जाहीर करून महाराष्ट्रातील कांदा बाहेर ज्या राज्यात मागणी आहे, अश्या ठिकाणी कांदा निर्यात करण्यात यावा जेणेकरून कांद्याला चांगला दर मिळून शेतकर्यांचा खर्च निघून येईल.लवकरच नाफेड मार्फत देखील कांदा खरेदीसाठी सुरू करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावा. शासनाने लवकरच शेतकर्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी शेतकर्यांच्या वतीने करण्यात येत आहे.




