दिल्ली । Delhi
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ठोस पाऊल उचलले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत ९ ठिकाणी एअर स्ट्राइक केल्या.
या हल्ल्यात अंदाजे ९० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. या संयुक्त कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे.भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी संयुक्तरित्या ही कारवाई पार पाडली. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने जागतिक स्तरावर दहशतवादाला कठोर उत्तर दिलं आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे आधीच पाकिस्तान बिथरलेला असताना आता भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी ‘अभी पिक्चर बाकी है…’ म्हणत त्यांचं टेन्शन आणखी वाढवलं आहे. जर, पाकिस्तानने भारतातील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून संघर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला, तर असे आणखी हल्ले शक्य आहेत, असे सूचक संकेत माजी लष्करप्रमुखांनी दिले.
https://x.com/ManojNaravane/status/1919975041921384635
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २६ नागरिकांच्या क्रूर हत्याकांडानंतर धाडसी आणि सुनियोजित प्रत्युत्तर म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानी हद्दीत मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू केली. ऑपरेशन सिंदूर करत भारताने दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.