दिल्ली । Delhi
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सूड घेत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केली. या विशेष मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं आहे.
भारतीय हवाई दलाने बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबा या संघटनांच्या नऊ अतिरेकी कॅम्प्सवर हल्ला चढवला. ही कारवाई अचूक नियोजन आणि जलद अंमलबजावणीचं उत्तम उदाहरण ठरली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय नागरिकांसह एका नेपाळी पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. विशेषतः या हल्ल्यात महिलांना जिवंत ठेवून त्यांच्या पतींना डोळ्यांदेखत गोळ्या घालण्यात आल्या होत्या. महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसण्याचा हा अमानवी कट होता.
हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव निवडण्यात आलं. यामागील अर्थ केवळ लष्करी संकेत नसून, भारताच्या मातृशक्तीविषयी असलेल्या आदरभावनेचं प्रतीक आहे. ज्यांच्या कुंकवावर हल्ला करण्यात आला, त्या स्त्रियांचा सन्मान राखण्यासाठी आणि त्यांच्या पतींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच ही मोहीम आखण्यात आली. भारतीय हवाई दलाने केलेली ही स्ट्राईक अत्यंत अचूक होती. या कारवाईत दहशतवाद्यांचे महत्त्वाचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, अनेक अतिरेकी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे दहशतवादी गटांना मोठा फटका बसला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश मिळाला आहे. भारत आता कोणत्याही प्रकारचा हल्ला सहन करणार नाही. विशेषतः महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्या प्रवृत्तींना आता थेट प्रत्युत्तर दिलं जाईल. या मोहिमेमुळे केवळ दहशतवाद्यांनाच धडा मिळालेला नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे. शांततेचा मार्ग निवडताना सुरक्षा आणि स्वाभिमान कायम ठेवणं हेच भारताचं धोरण असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.