अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राजकीयदृष्ट्या जागृत असणार्या अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन वर्षापासून सहा पंचायत समितीमध्ये प्रभारी राज आहे. या ठिकाणी गटविकास अधिकारी पद रिक्त आहे. रिक्त असणार्या या पदाचा पदभार सध्या प्रभारी अधिकार्यांच्या माथी मारण्यात आले आहे. विशेष म्हणजे अनेक महिन्यांपासून राहाता मतदारसंघात गटविकास अधिकारी प्रभारी आहे. प्रभारी राज असल्याने विकास कामांचा वेग मंदावला आहे.
सध्या संगमनेर, कोपरगाव, राहाता, पारनेर, कर्जत, नगर या सहा पंचायत समितीमध्ये नियमित गटविकास अधिकारी नसल्याने प्रभारी राज आहे. अहिल्यानगर जिल्हा हा राज्यातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा असून जिल्ह्यात 14 पंचायत समिती आहेत. या पंचायत समितीचा गाडा गटविकास अधिकारी यांच्या खांद्यावर आहे. त्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीवर गेल्या तीन वर्षापासून अधिक काळापासून प्रशासकाची नियुक्ती आहे. प्रशासक असल्याने कामकाज करताना अधिकार्यांची चलती राहिली आहे. अशावेळी नियमित अधिकारी नसेल तर कामकाजात अडचणींना समोरे जावे लागत आहे.
या सहा पंचायत समितीवर गेल्या दीड ते दोन वर्षांपासून गटविकास अधिकारी हे पद रिक्त असल्याने या पदाचा कारभार ए बीडीओ यांच्यामार्फत सुरू असला तरी अतिरिक्त कारभारामुळे संबंधित ठिकाणच्या ए बीडीओ यांची डोकेदुखी वाढली आहे. तीन वर्षाहून अधिक काळ प्रशासक राज असून राज्य सरकार व केंद्र सरकारच्या सर्व योजना प्रशासक यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनापोटी दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होत असून तो खर्च करून संबंधित निधीचे नियोजन करण्याचे काम तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्यावर आहे. मात्र, जिल्ह्यातील 14 पैकी सहा ठिकाणी प्रभारी राज असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढलेली आहे.
पंचायत समितीमार्फत घरकुल योजना ते ग्रामीण भागातील रस्त्याची कामे, शालेय शिक्षण, आरोग्य, महिला बालकल्याण यासह जलसंधारणाचे कामे देखील करण्यात येतात. या सर्व कामांची देखरेख करण्याची तसेच मंजूर झालेला निधी खर्च करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी यांच्यावर आहे. मात्र, असे असतांना संगमनेरचे गटविकास अधिकारी पद सहा महिन्यांपासून, राहाता आणि कोपरगावचे पद सात महिन्यांपासून तर पारनेर आणि कर्जतचे पद दीड वर्षापासून रिक्त आहे. रिक्त असणार्या या पदावर मे महिन्यांच्या अखेरीस नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र, अजूनही या पदावर नियमित गटविकास अधिकार्यांची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे प्रभारी अधिकारी आता वैतागले आहे. त्यांना त्यांच्या मूळ पदाचे काम करून गटविकास अधिकारी पदाचे कामकाज करावे लागत आहे. ग्रामविकास विभागाने तातडीने या रिक्त पदावर नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.