पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी(दि.20) शांततेत आणि अत्यंत चुरशीने मतदान झाले असून 68.76 टक्के मतदान झाले. एकूण 23,242 मतदारांपैकी 15,750 मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये 8,251 पुरुषांनी तर 7,499 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदान प्रभाग पाचमध्ये झाले तर प्रभाग दहामध्ये सर्वात कमी मतदान झाले. काही प्रभागांमध्ये नेते-कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ शाब्दिक चकमक वगळता अत्यंत शांततेत मतदान पार पडले. मतदानासाठी तरुणांचा मोठा प्रतिसाद दिसून आला.
पाथर्डी नगरपरिषदेसाठी एकूण 23,242 मतदार आहेत. दहा प्रभागांतून एकूण 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे. मतदानासाठी पालिका हद्दीत एकूण 27 मतदान केंद्र उभारण्यात आले होते. बाहेरगावी असलेले मतदार अपेक्षित प्रमाणात न आल्याने मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे बोलले जात आहे. शहरातील सर्व 27 मतदान केंद्रांवर सकाळपासून उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते तैनात होते. प्रत्येक मतदानासाठी कार्यकर्ते दिवसभर धावपळ करताना दिसत होते.
स्थानिक पातळीवरील निवडणूक असल्याने प्रचारात जेवढा जोर होता, तेवढाच जोर मतदानातही दिसून आला. प्रभाग एक, दोन, पाच आणि दहामध्ये नेते-कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते प्रताप ढाकणे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड, बंडू पाटील बोरुडे यांनी शहरातील सर्व मतदान केंद्रांना भेट देऊन कार्यकर्त्यांकडून मतदानाबाबत माहिती घेतली. प्रभागप्रभागांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी दुसर्या मतदान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्ते मतदान केंद्रावर मतदानासाठी आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. शहरातील बरेच मतदान बाहेरगावी असल्याने त्यांना मतदानासाठी आणल्यामुळे बाहेरच्या गाड्यांची रांग लागलेली दिसून आली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते हे स्वतः संपूर्ण केंद्रावर भेटी देत होते. दुपारच्या वेळी प्रभाग पाच आणि प्रभाग नऊ मध्ये मतदान केंद्राच्या बाहेर बरेचसे नागरिक मते यांना दिसताच त्यांनी स्वतः बाहेर काढून मतदान केंद्रावरील कार्यकर्त्यांना शंभर मीटरच्या बाहेर काढण्याचा फर्मान काढला.
पोलिसांनी तात्काळ बाहेर काढून त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित केली. प्रभाग पाच आणि नऊ मध्ये सर्वात जास्त किरकोळ वाद झाल्याचे पाहायला मिळाले. निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते, सहाय्यक डॉ. उद्धव नाईक, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली किरकोळ वाद वगळता निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली.




