आज भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. २६ जानेवारी…याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून भारत नावारुपाला आला.
पण देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन कसा साजरा झाला असेल असा कधी तुम्हाला प्रश्न पडला का? २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाऊसच्या दरबार हाऊसमध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी १९५० ला सकाळी १०.१८ मिनिटांनी भारताचं संविधान लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर काही मिनिटांनी १०.२४ वाजता डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती.
१९५० पासूनच प्रजासत्ताक दिनाला इतर देशातील पाहुणे बोलवण्यास सुरूवात झाली होती. प्रजासत्ताक दिन सोहळ्याला प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्याची परंपरा आहे. पहिल्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकर्णो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अर्थात, त्यावेळी सुरक्षेचा मुद्दा आजच्या इतका गंभीर नव्हता.
१९५० आणि १९५४ दरम्यान भारतात प्रजासत्ताक दोन समारोह साजरा करण्यासाठी एक निश्चित स्थळ नव्हतं.
सुरूवातीला हा समारोह लाल किल्ला, नॅशनल स्टेडियम, किंग्सवे कॅम्प आणि नंतर रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आला होता.
१९५५ मध्ये पहिल्यांदा राजपथाची प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी निश्चिती करण्यात आली. पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन इर्विन स्टेडियम (आताचा नॅशनल स्टेडियम)वर झाली होती. हे संचलन पाहण्यासाठी सुमारे १५ हजार लोक उपस्थित होते.
या दिवशी सेनेद्वारे परेड केली गेली होती आणि तोफांची सलामी देण्यात आली होती. परेडमध्ये सशस्त्र सेनेच्या तिन्ही दलांनी सहभाग घेतला होता. आजही प्रजासत्ताक दिन राजपथावरच साजरा केला जातो.