नाशिक । प्रतिनिधी Nashik
औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांसाठी मनपा प्रशासनाने कोट्यावधी रुपयांची तरतूद केली असली तरी प्रत्यक्षात मात्र रस्त्यांची झालेली दुरवस्था ( Pits on Roads ) पाहता केवळ मलमपट्टीच झाली होती का? असा प्रश्न उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे.
अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीच्या ( Ambad & Satpur Industrial Area ) रस्त्यांसाठी मनपा प्रशासनाने 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ झाला खरा मात्र उद्योग क्षेत्रात वाहतूक करणार्या अवजड वाहनांच्या क्षमता व त्या दृष्टीने रस्त्याची गुणवत्ता याबाबत फारसे लक्ष दिले गेले नसल्याचे औद्योगिक क्षेत्रातील रस्ते अनेक ठिकाणी उखडलेले दिसून येत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीत घेतल्यानंतर रस्त्यांवर रिसर्फेसिंगचे काम गतिमान करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र त्रासदायक असलेल्या एक्स्लो चौफुली, एमएसईबी पॉवर स्टेशन, गरवारे चौफुली, अंबड गावाजवळील पॉवर स्टेशन अशा अनेक चौफुल्यांंसह रस्त्यांच्या कामांचा दर्जा संशयाच्या भोवर्यात अडकत आहे. प्रशासनाच्या नियोजनाबद्दल उद्योजक नाराजी व्यक्त करीत आहेत.
रस्त्यांच्या कामांना प्रारंभ करण्यापूर्वी तेथील पाण्याचा निचरा करणार्या पाईपांमुळे रस्त्यावर पाणी थांबणार नाही याची काळजी घेण्यासाठी तरतूद केली न गेल्याने हे रस्ते लवकर खराब होत असल्याचे दावे उद्योजकांनी केले आहेत.