नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
सध्या राज्यासह देशात दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी देखील गोव्याच्या किनाऱ्यावर भारतीय नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सशस्त्र दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवारच्या किनाऱ्यावरील आयएनएस विक्रांतला भेट दिली. भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी जवानांना संबोधितही केले. यावेळी पंतप्रधानांनी स्वतःच्या हातांनी सैनिकांना मिठाई खाऊ घातली आणि त्यांची देशभक्तीपर गाणी ऐकली.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “काही महिन्यांपूर्वीच, आपण पाहिले की INS विक्रांत या नावाने पाकिस्तानची झोप उडवली होती. त्याचे सामर्थ्य इतके आहे की युद्ध सुरू होण्यापूर्वीच शत्रूचे मनोबल कमी होते. ही आयएनएस विक्रांतची शक्ती आहे… या प्रसंगी, मी आपल्या सशस्त्र दलांना विशेष सलाम करू इच्छितो,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
एका बाजूला विशाल समुद्र आणि दुसऱ्या बाजूला शूर सैनिकांची ताकद
यावेळी मोदी म्हणाले, “आजचा दिवस अद्भुत आहे. हा क्षण संस्मरणीय आहे. आज माझ्या एका बाजूला विशाल समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतमातेच्या शूर सैनिकांची अफाट ताकद आहे. आयएनएस विक्रांतवर काल रात्री वेळ खूप चांगला गेला. तो अनुभव शब्दात वर्णन करणे कठीण आहे. मी पाहिले की तुम्ही उत्साह आणि आनंदाने भरलेले होतात. तुम्ही गाणी गायलीत. तुम्ही तुमच्या गाण्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरचे ज्या प्रकारे वर्णन केलेत, ते खूपच अद्भूत होते. युद्धभूमीवर उभा असलेला सैनिक ज्या भावना व्यक्त करू शकतो, तशा भावना इतर कोणीही व्यक्त करू शकणार नाही.”
माझी दिवाळी खास बनली
“तुमच्या लोकांची मेहनत, साधना इतकी मोठी आहे की, ती मी जगू शकलो नाही. पण समजून नक्कीच घेतले” असे पीएम मोदी म्हणाले. “माझी दिवाळी खास बनली. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या शुभेच्छा. म्हणजेच जे माझे कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला आलो आहे. मीही ही दिवाळी माझ्या कुटुंबातील सदस्यांसोबत साजरी करत आहे,” असे ते म्हणाले.
विक्रांत विशाल, भव्य, प्रचंड, विहंगम अद्वितीय आहे
“मला आठवते, जेव्हा आयएनएस विक्रांत देशाला सोपवण्यात येत होती, तेव्हा मी म्हटले होते की विक्रांत प्रचंड, विशाल, भव्य, विहंगम आहे. विक्रांत अद्वितीय आहे, विक्रांत विशेष आहे. विक्रांत ही केवळ एक युद्धनौका नाही, तर ते २१ व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचे प्रमाण आहे,” असे मोदी म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




