नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दुबईत खेळवण्यात आलेल्या आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल (२८ सप्टेंबर) अंतिम सामना झाला. या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने आतापर्यंत नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक्सवर ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
मैदानातही ऑपरेशन सिंदूर
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाऊंटवर ट्विट करत भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. मैदानातही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच, भारताचा विजय…, असे नरेंद्र मोदी पोस्ट करत म्हणाले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. एक अद्भुत विजय. आमच्या मुलांच्या प्रचंड उर्जेने पुन्हा एकदा विरोधकांना पराभूत केले आहे. मैदान कोणतेही असो, भारत जिंकणारच हे निश्चित आहे, असे अमित शाह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पोस्ट पाकिस्तानच्या आसिफ ख्वाजा याला चांगलीच झोंबली. त्याने शांतता अशी येणार नसल्याचे वक्तव्य केलेय.
पंतप्रधान मोदींच्या पोस्टमुळे पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफ यांना मिर्ची चांगलीच लागली आहे. मोदींच्या एक्स पोस्टला उत्तर देताना म्हणाले की, “क्रिकेटची संस्कृती आणि भावनेचा नाश करून, मोदी आपले राजकारण वाचवत आहेत. ते उपखंडातील शांती आणि समस्यांचे निराकरण करण्याच्या शक्यतांना नष्ट करत आहेत. अशा प्रकारे शांती आणि सन्मान परत येत नाही. पाकिस्तान-भारत युद्धाचा स्कोअर 6/0 होता. आम्ही काही बोलत नाही. मोदींना भारत आणि जगात दोन्हीकडे अपमानित केले गेले आहे.”
सामन्याचा निकाल
पाकिस्तानने दिलेल्या १४७ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काहीशी खराब झाली. दुसऱ्या ओव्हरमध्येच इनफॉर्म बॅट्समन अभिषेक शर्मा आऊट झाला. फहीम अशरफने त्याला आऊट केले. शुभमन गिलने १० चेंडूत १२ धावा केल्या. तर कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यातही फ्लॉप राहिला, ५ चेंडूत फक्त १ रन करून आऊट झाला. यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकीय भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मात्र 13व्या ओव्हरमध्ये अबरारने संजू सॅमसन (24) ला आऊट केले. यानंतर शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी पुन्हा एक अर्धशतकीय भागीदारी केली. एक टप्प्यावर भारताला जिंकण्यासाठी फक्त 2 ओव्हरमध्ये 17 धावा लागत होत्या. अंतिम ओव्हरमध्ये 10 धावा हव्या होत्या आणि विजयी शॉट रिंकू सिंगने मारत भारताने सामना जिंकला. या सामन्यात भारतासाठी तिलक वर्माने 53 चेंडूत 69 नाबाद धावा केल्या त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले आणि भारतीय विजयाचा शिलेदार ठरला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




