नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(दि.5) राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली. मोदींचे भाषण सुरू होताच विरोधी पक्षांनी जोरदार गोंधळ घातला आणि राज्यसभेतून सभात्याग केला. विरोधकांच्या अनुपस्थितीतही पंतप्रधानांचे भाषण सुरू राहिले. याचदरम्यान त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना खाली बसून घोषणाबाजी करण्याचा सल्ला दिला.
विरोधकांच्या घोषणाबाजी दरम्यानही पंतप्रधान मोदींनी आपले भाषण सुरू ठेवले. यावेळी ते म्हणाले, सरकारने समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केले आहे आणि देशाच्या विकासाचा मार्ग स्पष्ट आहे. 21व्या शतकाचा पहिला क्वार्टर पूर्ण झाला आहे. आता दुसरा क्वार्टर अत्यंत निर्णायक असणार आहे. विकसित भारताच्या निर्मितीसाठी हा काळ वेगाने पुढे जाणारा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आज हे जाणवत आहे की, भारत एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे आपण आता थांबू नये किंवा मागे वळून पाहू नये. आपण फक्त पुढे जात राहिले पाहिजे आणि आपले ध्येय साध्य केल्यानंतरच सुटकेचा नि:श्वास सोडला पाहिजे. त्यामुळे आपण त्याच दिशेने पुढे जात आहोत, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
तत्पूर्वी, राज्यसभेत सभागृह नेते जेपी नड्डा आणि विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच, खरगे यांनी लोकसभेत मागील घटनेचा मुद्दा उपस्थित केला आणि म्हटले की, विरोधी पक्षनेत्याला तिथे बोलू दिले जात नाही. नड्डा यांनी त्यांना अडवले आणि सांगितले की, ते येथे दुसऱ्या सभागृहाच्या बाबींवर चर्चा करू शकत नाहीत.
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण होऊ शकले नाही पण आज राज्यसभेत मोदी भाषणासाठी उभे राहताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. विरोधी पक्ष नेत्याला लोकसभेत बोलू द्या, हुकुमशाही चालणार नाही, अशा घोषणा दिल्या. या वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी खुर्चीवर उभे राहून त्यांनी मोदीं विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
विरोधकांच्या घोषणाबाजीदरम्यान भाषण सुरू असतानाच नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी उद्देशून म्हटले की, माझी मल्लिकार्जून खर्गे यांना एक विनंती आहे. मल्लिकार्जून खर्गे यांचे वय पाहता त्यांनी खाली बसून घोषणाबाजी करावी. कारण त्यांच्या मागे अनेक तरुण नेते घोषणा देत आहेत, असा टोला मोदींनी मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह विरोधकांना लगावला. तसेच विरोधकांच्या घोषणाबाजीदरम्यान नरेंद्र मोदींनी आपले भाषण थांबवले नाही. त्यामुळे थोड्यावेळाने विरोधकांनी सभात्याग केला.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ” जगाचे भारताकडे आकर्षण कसे वाढले आहे हे मी पाहतो. जग भारताच्या प्रतिभेचे महत्त्व ओळखत आहे. आज आपल्याकडे जगात एक अतिशय महत्त्वाचा प्रतिभा समूह आहे. हा तरुण प्रतिभा समूह आहे, ज्यामध्ये स्वप्ने, दृढनिश्चय आणि शक्ती आहे. याचा अर्थ असा की सत्तेचे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत.”
पंतप्रधान म्हणाले, “भारत आज जगासमोरील आव्हानांना उपाय देणारा देश आहे, आशेचा किरण देणारा देश आहे आणि आम्ही ते उपाय देत आहोत. आज, भारताचा विकास प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. उच्च विकास दर आणि कमी चलनवाढ ही एक अद्वितीय कामगिरी आहे.”





