मुंबई | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज (बुधवारी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (New Mumbai Airport) उद्घाटन करण्यात आले. तसेच मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत असलेली मेट्रो एक्वा लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन देखील मोदींनी केले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि नेते उपस्थित होते.
यावेळी मोदी म्हणाले की, विजयादशमी झाली, कोजागिरीही झाली. आता दहा दिवसांनी येणाऱ्या दिवाळीच्या (Diwali) तुम्हा सर्वांना आधीच शुभेच्छा देतो असे म्हणत त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. तसेच दिबा पाटील यांचे कांम आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहे, असेही मोदी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, २०१४ साली मी जेव्हा पंतप्रधानं (PM) झालो, तेव्हा माझे स्वप्न होते की, हवाई चप्पल घालणारा सामान्य माणूसही हवाई प्रवास करू शकेल. यासाठी मी १० वर्षात अनेक विमानतळांना परवानग्या दिल्या. २०१४ साली देशात ७४ विमानतळ होते. त्याची संख्या वाढून आता १६० एवढी झाली आहे. भारताकडून १००० विमानांची ऑर्डर दिली आहे, असेही मोदींनी म्हटले.
मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाचे (Metro Project) उद्घाटन केले होते. पण त्यानंतर काही काळासाठी वेगळे सरकार आले आणि त्यांनी ते काम थांबवले. त्यांना सत्ता मिळाली. पण देशाला हजारो कोटींचे नुकसान झाले. मुंबईकरांना असुविधा झाली. आता मुंबई मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईत एका एका मिनिटाचे महत्त्व आहे. तिथे मुंबईकरांना या प्रकल्पासाठी चार ते पाच वर्षांची वाट पाहावी लागली, हे कोणत्याही पापापेक्षा कमी नाही, असे म्हणत मोदींनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडले.
ते पुढे म्हणाले की, मुंबईला (Mumbai) दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले असून, ते मुंबई शहराला आशियाशी जोडण्यासाठी मोलाची भूमिका निभावेल. मुंबईला आज भूमिगत मेट्रो देखील मिळाली आहे. यामुळे मुंबईत प्रवास आणखी सुकर होणार असून, लोकांचा वेळ वाचणार आहे. ही भूमिगत मेट्रो भारत विकसित होत असल्याची चिन्हे आहेत. मुंबईसारख्या शहरात इमारतींना धक्का न पोहोचता भूमिगत मेट्रो तयार करण्यात आली आहे. भूमिगत मेट्रो तयार करणारे श्रमिक आणि इंजिनिअरचे अभिनंदन करतो, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.




