नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू (Death) झाला होता. यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील तब्बल ९ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत बदला घेतला. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी थेट पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर (Adampur Airbase) पोहोचून जवानांसोबत संवाद साधला. या भेटीचे फोटो मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईचे कौतूक करत भारतीय जवानांची पाठ थोपटली. तसेच हवाई दलाच्या जवानांनी सद्यस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.
Earlier this morning, I went to AFS Adampur and met our brave air warriors and soldiers. It was a very special experience to be with those who epitomise courage, determination and fearlessness. India is eternally grateful to our armed forces for everything they do for our nation. pic.twitter.com/RYwfBfTrV2
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2025
दरम्यान, पाकिस्तानने (Pakistan) ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे एअरबेस असलेल्या आदमपूर एअरबेसवर १० मे रोजी ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, भारतीय हवाई दलाच्या (Air Force) जवानांनी हा हल्ला (Attack) हाणून पाडला होता. त्यामुळे या एअरबेसवरील जवानांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.
पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
मी सकाळी आदमपूर एअरबेसवर गेलो. त्या ठिकाणी हवाई दलातील सैनिकांची भेट घेतली. त्यांचे धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयता याला सॅल्यूट केले. त्यांच्यासोबत राहण्याचा एक अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी आपल्या सशस्त्र दलांनी जे काही केले आहे त्याबद्दल भारत त्यांचा सदैव ऋणी राहील, असे पीएम मोदी पोस्टमध्ये म्हणाले आहेत.