भोपाळ | Bhopal
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यातील एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या योगदानाचे कौतुक केले. याच दरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्धचे सर्वात मोठे ऑपरेशन आहे. आपल्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
“पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ भारतीयांचे रक्त सांडले नाही तर त्यांनी आपल्या संस्कृतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आमच्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी भारताच्या नारीशक्तीला आव्हान दिले आहे. हे आव्हान दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या आकांसाठी काळ ठरले आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या इतिहासातील दहशतवाद्यांविरुद्धचे सर्वात मोठे आणि सर्वात यशस्वी ऑपरेशन आहे. ज्याचा पाकिस्तानी सैन्याने विचारही केला नव्हता, तिथे आपल्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे शेकडो किलोमीटर आत घुसून उद्ध्वस्त केले.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आम्ही घरात घुसून मारू
“आता आम्ही घरात घुसूनही मारू आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. भारतातील प्रत्येक नागरिक म्हणत आहे की, जर तुम्ही गोळी झाडली तर गोळीचे उत्तर गोळीनेच दिले जाईल.पाकिस्तानी सैन्याने याचा विचारही केला नव्हता, तिथे जाऊन आमच्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. सिंदूर हे आमच्या परंपरेचे प्रतीक आहे, आता ते भारताच्या शौर्याचे प्रतीक आहे”.
अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक कार्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “अहिल्यादेवी होळकर यांनी गुलामगिरीच्या कठीण काळात काशी विश्वनाथसह अनेक तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांची पुनर्बांधणी करून देशाची संस्कृती जिवंत ठेवली. ज्या काशीमध्ये अहिल्याबाईंनी विकासाचे काम केले, तिथेच मला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. काशी विश्वनाथ संकुलातील त्यांचा पुतळा आजही प्रेरणा देतो.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “२५०-३०० वर्षांपूर्वी जेव्हा देश परकीय राजवटीखाली होता, तेव्हा अहिल्यादेवींनी असे काम केले, जे येणाऱ्या पिढ्यांनाही लक्षात राहिल. हे सोपे नव्हते. अहिल्यादेवींसारखी इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय असेल तर कोणताही अडथळा मोठा नसतो. आज इंदूर एक समृद्ध शहर म्हणून ओळखले जाते, पण त्याचा पाया अहिल्यादेवींच्या कार्यक्षम प्रशासनाने घातला होता.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांना समर्पित एक स्मारक टपाल तिकिट आणि ३०० रुपयांचे विशेष नाणे प्रसिद्ध केले. या प्रसंगी आदिवासी महिला कलाकारांना अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा