मुंबई | Mumbai
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी ‘आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा’, असे म्हणत राजकीय संन्यासाचे संकेत दिले होते. तसेच महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aaghadi) असताना शिवसेनेतून (Shivsena) मंत्रिपदाची संधी न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. तेव्हापासून भास्कर जाधव हे ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आता त्यांनी एक व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
भास्कर जाधव यांनी “दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते. दिवा विझल्यावर टाकलेल्या तेलाला अर्थ राहत नाही”, अशा आशयाचे व्हॉट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status) ठेवले आहे. तसेच माणसांची वेळेत किंमत केली नाही. तर पश्चाताप करून काय अर्थ? असा प्रश्न देखील त्यांनी केला आहे. तर दुसऱ्या एका स्टेटसमध्ये भास्कर जाधव यांनी लिहिले की, सर्वजण सोबत आहेत. तरीही एक प्रकारचा रितेपणा जाणवतोय, आजकाल नात्यांमध्येही दाखवण्यापुरता आपलेपणा उरला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना चांगलेच उधाण आले आहे.
दरम्यान, या नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव हे आज (गुरुवार) शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जाधव यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतल्यास त्यांच्या नाराजीच्या चर्चांवर तोडगा निघतो का? हे बघणे महत्वाचे असणार आहे.




