मुंबई | Mumbai
मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी (Santosh Dhuri) यांनी आज (मंगळवारी) आमदार अमित साटम (Amit Satam) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यामुळे मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. काल (सोमवारी) रात्री धुरी यांनी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती धुरी दिली होती. त्यानंतर संतोष धुरी यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशानंतर धुरी यांनी राज ठाकरेंनी पक्ष उद्धव ठाकरेंना सरेंडर केला असे म्हणत हल्लाबोल केला.
हे देखील वाचा : Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
यावेळी ते म्हणाले की, २००७ साली आम्ही राज ठाकरेंसोबत (Raj Thackeray) बाहेर पडलो. पहिले आम्ही शिवसेनेत होतो, नंतर मनसेत आलो आणि कार्य चालू ठेवलं. आमचं रक्त भगवं आहे. पण आता ज्या पद्धतीने युती झाली आहे, ज्या लोकांनी हिरव्या लोकांशी युती केली, त्यामुळे त्यांच्यातील लोक तुटून गेली. त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला. पण अशा लोकांनाच राज ठाकरेंनी जवळ केलं. त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्यांनी पक्षाचा पूर्ण ताबा घेतला आहे. आमचा पक्ष साहेबांनी त्यांना सरेंडर केला आहे, असा आरोप संतोष धुरी यांनी केला.
हे देखील वाचा : Nashik Politics : ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये ‘या’ तारखेला संयुक्त सभा; २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर
पुढे ते म्हणाले की, “मनसेला (MNS) ज्या ५२ जागा दिल्या आहेत तो आकडा फक्त दिसायला आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यातील ७ ते ८ जागा येतात की नाही यामध्ये शंका आहे. आम्हाला ज्या जागा हव्या होत्या त्या दिल्या नाहीत. माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप जिथे मराठी माणसाचा टक्का जास्त आहे, तिकडे आम्ही दोन दोन जागा मागितल्या होत्या. पण त्यांनी आमची एका जागेवर बोळवण केली, असे म्हणत धुरी यांनी जागावाटपात मनसेला दुय्यम वागणूक मिळाल्याचा दावा केला.
तसेच “मला जागावाटपाच्या चर्चेत घेतलं नाही किंवा उमेदवारी दिली नाही, याचा राग नाही. राज ठाकरेंनी आम्हाला आधीच भरपूर दिले आहे. पण आमचे नेते संदीप देशपांडे यांना जागावाटपाच्या चर्चेत कुठेही घेतले नाही. ज्यावेळी आम्ही याविषयी विचारणा केली, तेव्हा आम्हाला कळाले की, वरुन असा तह झाला आहे की, राज ठाकरेंनी संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे दोन किल्ले सरेंडर केले आहेत. हे दोघे उमेदवार म्हणून किंवा जागावाटपात कुठेही दिसणार नाहीत, असा आदेश वांद्र्याच्या बंगल्यावरुन आला होता”, असेही संतोष धुरी यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Nashik MC Politics : भाजपला आव्हान देतादेता ‘मित्र’ आले आमनेसामने; कुठे कोणामध्ये लढत?




