मुंबई | Mumbai
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजितदादांच्या मृत्यूला ७२ तासंही होत नाहीत, तोपर्यंत सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज (शनिवारी) सायंकाळी पाच वाजता राजभवनावर त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. काल (शुक्रवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल मंत्री छगन भुजबळ आणि आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. यादरम्यान उपमुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा झाली. त्यानंतर आज (शनिवारी) सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : दादांची सावली मंत्रालयात; सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, आज शपथविधी
दरम्यान आज सकाळी माध्यमांशी बोलतांना या शपथविधीबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले होते. तसेच दोन्ही पक्षाचे विलीनीकरण होणार होते, असेही ते म्हणाले होते. दुसरीकडे अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली जात होती. यावर आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, सर्वसामान्य आणि आमदारांचे मत विचारत घेतले. सुनेत्रा ताई यांना उपमुख्यमंत्री करणे अतिशय योग्य होईल आणि त्याप्रमाणे आम्ही ते करू, आता त्याची जी प्रक्रिया आहे, जे कोणी आमदार लोक आहेत, त्याप्रमाणे ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि ते आज दुपारी करू. मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा झाली असून ते पूर्ण सहकार्य करत आहेत. कदाचित आजच राज्यपालांना सांगून सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडेल, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Sunetra Pawar : सामाजिक कार्य, अजितदादांना राजकारणात खंबीर साथ ते पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; अशी आहे सुनेत्रा पवारांची राजकीय वाटचाल
तर शरद पवारांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या विषयावर आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाबाबत (Deputy Chief Minister Post) आपल्याला कोणतीही कल्पना दिली नसल्याचे म्हटले होते. त्यावर बोलतांना भुजबळ म्हणाले की, मला यावर काहीच बोलायचे नाही. पत्र लवकरच निघावे, याकरिता कालपासून माझा प्रयत्न होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणून आज जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (NCP) सर्वात मोठे पद कोणते असेल तर ते उपमुख्यमंत्री पद आहे. त्यामुळे तिथे योग्य पद्धतीने ती सूत्रे जी आहेत ती सुनेत्राताईंच्या हातात देणे हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर ते ठरवतील पुढे काय काय करायचे असे म्हणत त्यांनी शरद पवारांच्या प्रश्नावर बोलण्याचे टाळले.




