मुंबई | Mumbai
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दररोज अनेक पदाधिकारी ‘जय महाराष्ट्र’ करून महायुतीमधील घटक पक्षांत प्रवेश करत आहेत. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना खिळखिळी होतांना बघायला मिळत आहे. मागील आठवड्यातच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी आपल्या समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याआधी विधानपरिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी प्रवेश केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना महाजन म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांची शिवसेना जमिनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्याकडे येत्या आठ दिवसांत कोण राहिलं हे कळेलं. संजय राऊतांच्या बडबडीमुळे आणि वागण्यामुळे सर्व त्रस्त आहेत. संजय राऊत आऊट ऑफ कंट्रोल झाले आहेत. पण हा पक्ष संपवण्याकरता संजय राऊत पुरेसे आहेत”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “संजय राऊत यांच्याबद्दल उत्तर देण्यासाठी काही पुरेसे नाही. त्यांना जास्त प्रसिद्धी आणि मनावर घेऊ नका. तुमची बडबड तुमचे विचार काय ते बघू, निवडणुकीला सामोरे या त्यानंतर आपण भेटू असे म्हणत महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक सर्वपक्षीय नेते प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत”, असेही मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले.
पालकमंत्रीपदाबाबत महाजन काय म्हणाले?
मी सिंहस्थ कुंभमेळा मंत्री असून, माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे यावर मी काही वेगळं बोलू शकत नाही. तसेच कालच्या बैठकीसाठी फक्त मंत्र्यांना आमंत्रण होते. आमदार खासदार यांना नव्हते, असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले.