नाशिक | Nashik
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मुंबई शहराध्यक्ष पदाचा राजीनामा (Resign) देऊन नांदगाव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक (Vidhansabha Election) लढवली होती. नांदगाव विधानसभा मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.
या मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti) शिवसेनेच्या (शिंदे गट) सुहास कांदे (Suhas Kande) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) शिवसेना ठाकरे गटाने गणेश धात्रक रिंगणात होते. या तिरंगी लढतीमध्ये सुहास कांदे यांनी दणदणीत विजय मिळवला होता. तसेच समीर भुजबळ यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. तर मविआचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता.
ही निवडणूक कांदे आणि भुजबळ (Kande and Bhujbal) यांच्या अंतर्गत वादामुळे चांगलीच गाजली होती. अशातच आता माध्यमांशी बोलतांना माजी खासदार समीर भुजबळ यांनी मुंबई शहराध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबाबत मोठे विधान केले आहे. त्यावर लगेचच नांदगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास (MLA Suhas Kande) यांनी प्रतिक्रिया देत, समीर भुजबळांवर तोफ डागली आहे.
समीर भुजबळ माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीपूर्वी मी मुंबई शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, परंतू, तो अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. मी यापूर्वीही पक्षाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिलो आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात आमच्या कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागला होता, म्हणूनच मी त्यावेळी उमेदवारी केली होती. त्यानंतर आता पक्षाने मला काय जबाबदारी द्यायची, हे ठरवावे”, असे समीर भुजबळ यांनी म्हटले.
समीर भुजबळांच्या विधानानंतर कांदे काय म्हणाले?
माजी खासदार समीर भुजबळांनी केलेल्या विधानानंतर आमदार सुहास कांदे म्हणाले की, “समीर भुजबळ हा अजित पवारांकडून हुसकलेला माणूस आहे. माझ्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी समीर भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारला देखील होता. महायुतीच्या विरोधात ज्यांनी कामे केली, त्या सगळ्यांचीच हकालपट्टी केली जाईल, असे ठरलेले होते. महायुतीमध्ये असे अनेक उदाहरणे आहेत”, असे त्यांनी म्हटले. तसेच ईडी, सीबीआय यापासून वाचण्यासाठी समीर भुजबळ अजित पवारांच्या पुढे-पुढे करत आहेत. महायुतीची सत्ता आली, मात्र भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेले नाही. भुजबळ साहेबांचे वय झाले त्यांचे जाऊ द्या. मात्र,समीर भुजबळांवर मला दया येत आहे. हुसकलेले असताना ते परत येत आहेत, अशी खरमरीत टीका आमदार कांदेंनी केली.