मुंबई | Mumbai
मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी राज्याचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर केलेल्या टीकेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी “पुन्हा आमच्याविरोधात बोललात, तर उलट्या करायला लावीन,” असे म्हणत इशारा दिला होता. यानंतर राणे समर्थकांकडून फोनवरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. त्यानंतर आता प्रकाश महाजन यांनी थेट नारायण राणे यांच्याविरोधात दंड थोपटले आहे.
माध्यमांशी बोलतांना प्रकाश महाजन म्हणाले की, “मी नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढायला तयार आहे. नारायण राणे मी कणकवलीत येतो, करायला लावा उलट्या. मला लेचपेचा समजू नका. माझ्या नेत्यावर टीका करणार, मी काय तुमच्या मुलावर फुले उधळू का?” असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला आहे. तसेच, “उद्या जर का माझा अपघात झाला, तर याची सर्वस्वी जबाबदारी नारायण राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची (Worker) असेल”, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, “तुमच्यात हिंमत असेल तर राणे साहेबांनी आणि त्यांच्या दोन मुलांनी स्वतः यावे. मी येऊन उभा राहतो. मला घाणेरड्या शब्दात शिव्या देतात. या वयात मला माझ्या आई वरून शिव्या देतात. हेच संस्कार नारायण राणे साहेबांनी यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत का? दुसऱ्याच्या नेत्याविषयी तुम्ही असभ्य भाषा वापरता आणि तुमच्या विषयी भाषा वापरल्यावर तुम्हाला राग येतो. मी ७३ वर्षाचा माणूस आहे. त्यामुळे मला आता जगण्याची काही इच्छा राहिली नाही”, असेही प्रकाश महाजन यांनी म्हटले.
महाजन पुढे म्हणाले की, “उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उध्दव म्हणतो, ते तुझ्या वयाचे आहेत का? मी कुठे येऊ सांगा. दिल्ली, मुंबई किंवा कणकवलीतल्या घरी येतो. तुम्हाला घाबरणारे दुसरे असतील. जीवाला घाबरलो असतो, तर एक शिक्षकाचा मुलगा राजकारणात आला नसता. नारायण राणे आता भाजपमध्ये (BJP) आले असून,मी बाळ स्वयंसेवक आहे, आणीबाणी भोगली आहे. ज्या गोपीनाथ मुंडेंनी राज्यातील गुन्हेगारी विरोधात आवाज उठवला, त्या भारतीय जनता पार्टीत असे गुन्हेगार येऊन बसले हे दुर्दैव आहे” अशा शब्दात त्यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?
राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी आपल्या विचारसरणीची पातळी, बुद्धिमत्ता आणि जनमानसातील प्रतिमा या तरुण वयातच सिद्ध केली आहे. निलेश, नितेश आणि नारायण राणे हे दूरच पण आमची वैचारिक उंची मोजणारे तुम्ही तरी कोण? आमच्या विचारांची उंची ही जनतेने ठरवलेली आहे. नितेश राणे हे लोकांच्या मतांवर तीन वेळा निवडून आले आहेत. तुम्ही किती वेळा निवडून आला आहात? जर तुम्ही राणेंच्या वाटेला गेला आहात, तर योग्य मार्ग दाखवण्याचे काम मी निश्चित करीन. निलेश आणि नितेश यांना निष्ठा शिकवण्याची आवश्यकता नाही. तुमच्यासारख्या दीड दमडीच्या माणसांकडून तर नाहीच. प्रकाश महाजन, तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात. पुन्हा काही बोललात, तर उलट्या करायला लावीन, असा धमकीवजा इशारा नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांना दिला होता.