मुंबई | Mumbai
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता खुद्द पटेल यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर अकाऊंटवर एक पोस्ट करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या (News) फिरत असल्याचे निदर्शानास आले आहे. मात्र, प्रसारित होणारं हे वृत्त पूर्णपणे निराधार असून, यात कोणतेही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा एक लोकशाहीने चालणारा पक्ष आहे. अध्यक्षपदासारख्या मोठ्या पदाचा निर्णय कोणीही एकटा घेऊ शकत नाही. त्यासाठी प्रक्रिया महत्त्वाची आहे. पक्षातील मोठे नेते आणि निवडून आलेल्या आमदारांशी, पक्षाचे काम पाहणाऱ्या महत्त्वाच्या लोकांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जातो. अध्यक्षपदाची निवड करताना पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनाही लक्षात घेतल्या जातात, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. राष्ट्रवादी हा राष्ट्रीय पक्ष आहे, आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड पूर्वीपासून चालत आलेल्या प्रक्रियेनुसारच होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पियूष गोयल काय म्हणाले?
पियुष गोयल (Piyush Goyal) पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना म्हणाले होते की, “महायुती अंतर्गत आमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य व आमदारांनी (MLA) भेटून सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या नेत्या म्हणून निवड केली. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की त्या चांगले काम करतील; त्या खूप दयाळू आहेत. मी त्यांना राज्यसभेत आणि बारामतीमधील त्यांच्या मतदारसंघातील जनतेची सेवा करताना पाहिले आहे. आम्ही माझे मित्र अजित दादांना खूप मिस करू. ते एक महान प्रशासक, लोकांचे नेते आणि महाराष्ट्राच्या जनतेचे लाडके होते. त्यांच्या निधनाने निश्चितच एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मी त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो आणि सुनेत्रा वहिनी यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे होतं. ते आता सुनेत्रा पवार यांच्याकडे होतं. प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. शरद पवार यांनी लोकांचा विश्वास गमावला आहे. असं गोयल यांनी म्हटले होते.
सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर काल (दि.३१) राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकमताने सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची निवड करण्यात आली. त्यानंतर लोकभवन येथे त्यांना राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. त्यांच्याकडे तीन महत्त्वाची खाती देण्यात आली आहे. ज्यात क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.





