नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
मणिपूरमध्ये (Manipur) पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही वर्षांपासून आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्यामुळे अशांत असलेल्या मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी एनडीएच्या १० आमदारांनी मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला (Ajay Bhalla) यांची भेट घेत सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना या आमदारांनी पत्र पाठविले होते.
यात मणिपूरमध्ये शांतता नांदविण्यासाठी लोकप्रिय सरकार स्थापन करण्याची मागणी केली होती. या पत्रावर भाजपच्या १३, एनपीपी व नागा पीपल्स फ्रंटचे प्रत्येकी तीन आणि दोन अपक्ष अशा २१ आमदारांची सही होती. त्यानंतर आज अमित शाह भाजपाच्या नेतृत्वात या दहा आमदारांनी (MLA) सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ४४ आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी मणिपूरमध्ये ११ व्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. यानंतर आता लवकरच मणिपूरमध्ये सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
यावेळी राज्यपालांच्या (Governor) भेटीनंतर आमदार थोक्चोम राधेश्याम सिंह (Thokchom Radheshyam Singh) म्हणाले की, “आम्हाला ४४ आमदारांचा पाठिंबा आहे. जनतेच्या इच्छेनुसार सरकार स्थापन करण्यास तयार आहोत. राज्यपालांनी आमच्या बहुमताचा विचार करून तातडीने कार्यवाही करावी”, अशी मागणी आम्ही केली असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच राज्यपालांकडून संविधानिक तरतुदींनुसार निर्णय घेण्याची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.
तर अपक्ष आमदार निशिकांत सिंह (MLA Nishikant Singh) म्हणाले की, “राज्यपालांना आम्ही एक कागदही दिला आहे. ज्यावर २२ आमदारांच्या सह्या आहेत. एनडीए आमदार (NDA MLA) सरकार स्थापन करण्यास खूप उत्सुक आहेत. यासाठी १० आमदार राज्यपालांच्या भेटीला आलो आहोत”, असेही त्यांनी म्हटले.