नवी दिल्ली | New Delhi
लोकसभेत ‘अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयका’वर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (बुधवारी) भाषण केले. यावेळी त्यांनी उपमा आणि रूपकांचा वापर करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला, ज्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि लोकसभेचे (Loksabha) कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.
‘विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त’ वक्तव्यावरून गदारोळ
आपले भाषण सुरू करताना राहुल गांधी यांनी देशात तीन प्रकारचे लोक असतात असे सांगत ‘विद्यार्थी (Student), मूर्ख (Idiot) आणि अंधभक्त’ या तीन वर्गवाऱ्यांचा (Categories) उल्लेख केला. विद्यार्थी नेहमी सत्याच्या पाठीशी उभा राहतो. दुसऱ्या प्रकारचे लोक स्वतःच्या प्रतिमेची (Image) काळजी करतात आणि त्यांना आपणच देव असल्याचा भास होतो. तर तिसरी वर्गवारी (अंधभक्त) ही मूर्खांचे अनुकरण करते,” असा खोचक टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप खासदारांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप करत राहुल गांधी यांनी असंसदीय भाषेचा वापर केल्याचा आरोप केला. तसेच हे शब्द कामकाजातून काढून टाकण्याची आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
तरुणांचा राग ही हिंसा नाही
विधेयकावर बोलताना राहुल गांधी यांनी नीटसह इतर परीक्षांमधील पेपरफुटीच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. जंतर-मंतरवर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांची बाजू मांडताना ते म्हणाले की, “देशाचे भविष्य आज रस्त्यावर उतरले आहे. विद्यार्थ्यांचा हा राग किंवा आंदोलन म्हणजे कोणतीही हिंसा किंवा द्वेष नव्हता, तर तो या देशातील तरुणाईचा आवाज होता. भाजपमधील माझ्या मित्रांनी आपल्या मुलांना विचारून पाहावे, तरुण काय अनुभवत आहेत हे त्यांची मुलेही सांगतील. सर्व राजकीय पक्षांनी या तरुणांच्या आवाजाचा सन्मान करायला हवा” असेही त्यांनी म्हटले.
माईक बंद केल्याचा आरोप आणि कामकाज तहकूब
चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी गृहमंत्रालयाने पोलिसांना विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला. या दाव्याच्या पुष्ट्यार्थ पुरावा देण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. गदारोळ वाढल्यानंतर आपला माईक बंद करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला.यावेळी सभागृहातील वाढता गोंधळ आणि गदारोळ पाहता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब केले.




