मुंबई | Mumbai
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहित नाशिक पोलिसांवर (Nashik Police) गंभीर आरोप केले आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील (Yeola Taluka) नगरसूल येथील कृष्णा डोंगरे नावाच्या एका शेतकऱ्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याचे हाल केले आहेत. त्याचा सरकारविरोधातील आवाज दाबण्यासाठी हे सर्व करण्यात आल्याचे राऊतांनी म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र शेअर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) मागील निवडणुकीवेळी नाशिकमधील एका सभेत कृष्णा डोंगरे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने आंदोलन केले होते. कांद्याला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा त्यांनी त्यावेळी प्रयत्न केला होता.त्याचा राग मनात ठेऊन हा माणूस सतत सरकारविरुद्ध शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो म्हणून नाशिकचे पोलीस अधिकारी नेहमीच खोटी काम करणारे मंत्री (Minister) यांनी एकत्र येऊन कृष्णा डोंगरे याच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “एका भाजप (BJP) पुरस्कृत शिक्षण संस्था आणि त्यात शिक्षिका यांना हाताशी धरुन कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लावला आहे.त्याच्यावर अटकेची टांगती तलवार ठेवली,त्याला गावतून पळवून लावले. सरकार विरुद्ध आंदोलन करायचं नाही. मंत्र्याविरुद्ध आंदोलन करायचं नाही म्हणून हे सर्व करण्यात आलं. ज्या दिवशी बलात्कार झाला, अशा प्रकारचा गुन्हा नोंद झाला, कोर्टात सिद्ध झालं म्हणून सांगितलं जातंय त्या दिवशी कृष्णा डोंगर त्या भागात नव्हते ते कुटुंबासोबत सप्तशृंगी गडावर देवदर्शनाला गेले होते. कुटुंबासह धार्मिक कार्यामध्ये ते असल्याचं वणीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप केला”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
पोलिसांवर काय आरोप केले?
नाशिकमध्ये (Nashik) आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे आणि मकोका दाखल केला. त्यांच्या कुटुंबाची समाज माध्यमावर बदनामी करतो म्हणून जाब विचारायला गेले तर त्यांच्यावरती अटेम्प्ट टू मर्डर असे गुन्हे दाखल केले. भाजपमध्ये जाण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारल्यावर ते गुन्हे पोलीस (Police) मागे घेतात किंवा थांबवतात. ते गुन्हे मागे घेतले जातात. आज ते भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर आहेत म्हणून त्यांना हात लागला नाही, असं राऊतांनी म्हटले.
पत्रात नेमकं काय म्हटलंय?
मुख्यमंत्री महोदय,
सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीत पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून त्यांना भयंकर अशा खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले जाते. हाच प्रकार कृष्णा डोंगरे यांच्याबाबतीत घडला आहे. महाराष्ट्रातील अत्याचारग्रस्त शेतकऱ्याचा आवाज म्हणून मी डोंगरे यांना ओळखतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर डोंगरे यांनी अनेकदा निर्भयपणे आंदोलने केली. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही म्हणून नाशिकमध्ये कांद्याची होळी करण्याचे मोठे आंदोलन त्यांनी केले. सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अर्धनग्न आंदोलन केले, कांदा अग्निडाग समारंभासारखे अनोखे आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रक्ताने लिहिलेली पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवून डोंगरे यांनी संघर्ष सुरूच ठेवला. मात्र पंतप्रधान मोदी हे नाशिक परिसरात आले तेव्हा त्यांच्या सभेत जाऊन कांदाप्रश्नी आंदोलन करण्याचे धाडस डोंगरे यांनी दाखवल्यापासून ते सरकारच्या नजरेत खुपू लागले.
पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक येथील सभेत आंदोलन करून या शेतकऱ्याने भाजप सरकारची झोप उडवली. त्यामुळे त्याला अटकाव करण्यासाठी बलात्काराचे, विनयभंगाचे एक बनावट प्रकरण पोलिसांना हाताशी धरून रचण्यात आले. पोलीस व राजकरण्यांनी एका महिलेस हाताशी धरून डोंगरे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. खोट्या तक्रारीवर डोंगरे यांना कुटुंबासह उद्ध्वस्त करण्याच्या कारस्थानात भाजपचे मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी सामील होते. त्या कारस्थानामुळे डोंगरे यांना घर-कुटुंब सोडून परागंदा व्हावे लागले. भाजपासंबंधित शिक्षण संस्थाचालक व संस्थेत काम करणाऱ्या महिला शिक्षिकेने विनयभंगाची खोटी तक्रार केली. व त्याआधारे डोंगरे यांना अटक करण्याचे कारस्थान रचले. पण पोलिसांचे दुर्दैव असे की, ज्या खोट्या तक्रारीनुसार बलात्कार कांड घडले त्या तारखेला व त्या क्षणी डोंगरे हे घटनास्थळीच नव्हते, तर वणी येथे सप्तशृंगी गडावर धार्मिक कार्यासाठी गेले होते हे सीसीटीव्ही फुटेजवरून सिद्ध झाल्याने भाजपचे मंत्री व पोलिसांचा बनाव उघड झाला.
एका शेतकरी आंदोलकाचा आवाज दडपण्यासाठी राज्याचे मंत्री, पोलीस अधिकारी इतक्या खालच्या पातळीवर गेले हे महाराष्ट्राच्या परंपरेला व प्रशासनाला शोभणारे नाही. कृष्णा डोंगरे यांच्या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी व राजकीय नेते गुंतलेले आहेत. त्यामुळे कृष्णा डोंगरे यांच्यावर आणखी खोटे गुन्हे दाखल होतील किंवा त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होईल अशी भीती मला वाटते. हे चित्र महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे नाही. लोकशाही व स्वातंत्र्याची ही गळचेपी आहे. डोंगरे यांच्यावर बलात्कारासारखे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना खतम करण्याचे नक्सली’ कट । कारस्थान रचणाऱ्या अतिरेकी शक्तीवर जन सुरक्षा कायद्याने कारवाई करावी. कृष्णा भगवान डोंगरे (रा. नगरसूल, ता. येवला, जि. नाशिक) यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या नावे लिहिलेला तक्रारीचा अर्ज पुराव्यासह जोडला आहे. सरकारकडे माणुसकी व कायद्याबाबत आदर शिल्लक असेल तर कृष्णा डोंगरे यांना न्याय मिळेल हे पहावे.




