मुंबई | Mumbai
आगामी महापालिका निवडणूक (BMC Election) सत्ताधारी महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. तर विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये मात्र बरेच मतभेद आहेत. काँग्रेस पक्षाने तर मनसेसोबत असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करणार नाही, असे जाहीरपणे बोलून दाखवलेले आहे. दुसरीकडे आता
मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही यावरुन काँग्रेसमध्ये(Mumbai Congress) मतमतांतरे आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत जाण्यास नकार दिला आहे, तर आमदार विजय वडेट्टीवार यांचा मात्र मनसेला सोबत घेण्याकडे कल असल्याचे दिसत आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे.
राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “दिल्लीतून (Delhi) आदेश आल्याशिवाय मनसेला (MNS) आघाडीत घेणार नाही. मुंबई काँग्रेस हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. शिवसेना आणि मनसे (Shivsena and MNS) आधीच एकत्र आले आहेत, ही लोकांची इच्छा आहे. त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत, मुंबई वाचवा, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) प्रकृती बिघडल्याने ते सध्या सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत. त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील राजकारणात काय घडतं आहे यावर त्यांचे बारीक लक्ष आहे. अशातच आज त्यांनी एक्सवर पोस्ट करून काँग्रेसला चांगलेच सुनावले आहे. दुसरीकडे,मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी आपण सकारात्मक असल्याचे शरद पवारांनीही स्पष्ट केले आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या या भूमिकेनंतर आता मुंबई काँग्रेसचे नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.





