मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षातील काही नेते भाजपाबरोबर (BJP) जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये रंगत आहे. यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे. तसेच नवी पिढी भाजपाबरोबर जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याशिवाय फडणवीस यांनी शरद पवारांचे केलेल्या कौतुकावरही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलतांना भाष्य केले आहे.
यावेळी राऊत म्हणाले की, “शरद पवारांची जी नवी पिढी आहे, ती भाजपसोबत जाण्यासाठी व्याकूळ आहे, त्यामुळे कदाचित अजित पवाराचे महत्व कमी करून या मोठ्या गटाला भाजपासोबत घेणे होऊ शकते. शिवसेनेची नवी पिढी, शिंदे वगैरे भाजपसोबत गेले, तसाच निर्णय शरद पवारांची नवी पिढी देखील घेऊ शकते का असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार (Sharad Pawar) नव्हे पण त्यांची नवी पिढी हे पाऊल उचलू शकतात” असे म्हणत राऊतांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला (NCP Sharad Pawar) खोचक टोला लगावला.
तसेच “सुप्रिया सुळे (Supriya Sule) याचं किंवा अन्य काही नेत्यांचे नाव तुम्ही वारंवार घेत आहात. त्यांना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल. पण तहान लागल्यावर कोणी गटारातलं गढूळ पाणी पीत नाही. तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात जरी उडी मारायची ठरवले तर त्या सागरात इतक्या लाटा उसळल्या आहेत, त्यात इतकी गर्दी आहे की, प्रत्येकाला आपले स्थान शोधावे लागेल. जे गेलेले आहेत, तेच तिथे अस्तित्वासाठी धडपडत आहेत. नवी पिढी जाऊन काय करणार”, असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी विचारला.
पुढे ते म्हणाले की, “मला असं वाटतं शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत. आता ते कोचिंगच्या भूमिकेत आहेत. त्यांची विचारधारा, भूमिका मला माहित आहे. त्यांचं वय ८५ वर्ष आहे. परंतु ,अशा नेत्यांना वयाची बंधने नसतात. त्यांच्या भूमिका विचारधारा बघितल्यावर ते भाजपसोबत कधीच जाणार नाहीत, हा मला विश्वास आहे. आम्ही घडवलेल्या काही पिढ्या गेल्या त्याला आम्ही काय करणार? माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले अनेक लोक पळून गेले. राज ठाकरे असतील, गणेश नाईक असतील ते पळून गेले. सध्याच्या राजकारणात (Politics) कुणी कुणाच्या हातात राहत नाही. राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालेले आहे”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.