मुंबई | Mumbai
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यात मुंबई महानगरपालिकेसाठी (Mumbai NMC) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुंबईतील वांद्रा येथील ताज हॉटेलमध्ये गुप्त भेट झाली. जवळपास दोघांमध्ये अर्धा ते एक तास ही बैठक सुरु होती. यामुळे मनसे-शिवसेना उबाठा युतीला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केला आहे.
राऊत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या रोखठोक या सदरातून हा दावा केला आहे. त्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी कोणत्या कारणासाठी भेट झाली, याबद्दलची माहिती दिली आहे. राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटले आहे की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांच्यात मराठी माणसांच्या भविष्याबद्दल चर्चा झाली असावी, पण ती एकतर्फीच असावी. मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करू पाहणाऱ्या गौतम अदानींचे (Gautam Adani) फडणवीस उघड समर्थक आहेत. त्यांनी मुंबईच्या सर्व जमिनी अदानींना दिल्या. मुंबईला भिकारी करून सगळा माल गुजरातला नेण्याचा डाव आहे का? असा प्रश्न राज ठाकरेंनी फडणवीसांना विचारला असावा, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना हवे तेच फडणवीस करणार व अमित शहा हे मुंबईकडे व्यापार म्हणून बघतात. फडणवीस-राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे. फडणवीस हे एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतात. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष आपल्या तालावर चालतो व नेते त्याच तालावर नाचतात असे त्यांना वाटते. महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या मदाऱ्यांचा खेळ सुरू आहे इतकेच, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
देशात लोक किड्या-मुंग्यांसारखे मरत आहेत
मुंबई, महाराष्ट्र आणि देशात लोक किड्या-मुंग्यांसारखे मरत आहेत. राजकारणी अश्रू ढाळण्याचे ढोंग करतात. मराठी माणूस मुंबईत संपवला जातोय याची चर्चा कोणी करत नाही. राज्यकर्ते कोणीही असोत, सामान्य माणसे किड्या-मुंग्यांसारखी मरतच आहेत व राजकारणी तेवढ्यापुरते अश्रू ढाळण्याचे ढोंग करतात. मुंबईत चालत्या लोकलमधून १३ प्रवासी पडले. त्यातले चार जण मरण पावले. राजकारण्यांनी खोटे अश्रू ढाळले व पुन्हा राजकारण करायला मोकळे झाले. काश्मीर खोऱ्यात पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ मायभगिनींच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले. बंगळुरूत एका क्रिकेट टीमचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी हजारो लोक जमा झाले. त्या गर्दीत इतकी चेंगराचेंगरी झाली की, त्यात ११ लोकांना प्राण गमवावे लागले. मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला व त्यात नव्याने लोक बळी पडत आहेत. या भयंकर चित्राने ११ वर्षे राज्य करणारे मोदी जराही विचलित होत नाहीत. ते निर्विकार चेहऱ्याने सत्तेच्या खुर्चीवर विराजमान आहेत. फक्त कश्मीरातील पहलगाम येथील हल्ल्यातच नव्हे, तर बंगळुरू, मुंबई, मणिपुरातील घटनांतही मृत्यूच झाले व तेथेही कुणाचे तरी कुंकूच पुसले गेले, पण सरकारला त्याचे काय? असा सवाल संजय राऊतांनी केला.
प्रशासक काळात कमिशनमधून ३४ हजार कोटींची कमाई
मुंबई पालिकेवर चार वर्षे लोकप्रतिनिधींचे राज्य नाही. मुख्यमंत्र्यांना ‘रिपोर्टिंग’ करणारा प्रशासक तेथे आहे. या काळात कमिशनबाजीतून ३४ हजार कोटी रुपये संबंधितांच्या खासगी तिजोरीत गेले. यातला किती वाटा फडणवीस व किती शिंदे यांना मिळाला तो आकडा समजला म्हणजे जनता राज्यकर्त्यांच्या कर्तबगारीवर फुले उधळायला मोकळी. मुंबईतून ३४ हजारांवर कोटींची कमाई केली. महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे कोणती महानगरपालिका किती कोटींना लुटली हे समजून घेणे रंजक आहे. या देशात जो काळा पैसा निर्माण होतो त्याचे प्रमुख केंद्र मुंबई आहे. दर तासाला देशात पावणेदोनशे कोटी रुपयांचा काळा पैसा निर्माण होतो. तो सर्व ३६५ दिवस होतो. त्यात मुंबईचा वाटा सर्वाधिक आहे, असेही राऊतांनी म्हटले.