मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या प्रकरणावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बीडमधील या परिस्थितीवरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच काल माध्यमांशी बोलतांना भाजपचे आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी हा सिने अभिनेत्रींच्या कार्यक्रमांचा दाखला देत इव्हेंट पॉलिटिक्स सुरु असल्याचे म्हटले होते. यावेळी धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा देखील उल्लेख केला होता. त्यावरून आज अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद घेत आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी करत विविध विषयांवर भाष्य केले.
यावेळी बोलतांना प्राजक्ता माळी (Prajakta Mali) म्हणाली की,”बीड जिल्ह्यातील माननीय आमदार सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी तुमच्यासमोर आली आहे. गेले दीड महिने अत्यंत शांतपणाने मी या सगळ्याला सामोरे जात आहे. मी ट्रोलिंग आणि नेगेटिव्ह कमेंट्सला सामोरे जात आहे. ही माझी शांतता मूक समंती नाही. ही कलाकाराची हतबलता आहे. हे शांत राहणे तुमच्यामुळे आमच्यावर कुठेतरी बेतलेलं आहे. एक व्यक्ती रागाच्या भरात बोलते. त्या दोन वाक्याचे हजारो वाक्य बोलले जातात.चिखलफेक चालू राहते, महिलांची अब्रू निघत राहते, सर्वांचे मनोरंजन होतं राहतं म्हणून यात पडले नाही. गटारात दगड टाकणे मला योग्य वाटले नाही, हा विषय खोटा असून त्याला कुठलाच बेस नाही”, असे तिने सांगितले.
पुढे बोलतांना प्राजक्ता माळी म्हणाली की, “एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढलेला फोटो ती आमची एकमेव भेट आहे. धन्यवाद हा आमच्यातील एकमेव संभाषण आहे. मी या आधीही हजारो नेते आणि मान्यवरांसोबत फोटो काढले आहे. मग त्यांच्यासोबत नाव जोडणार का? हे खूपच कुस्थित आहे. कोणता पुरुष कलाकार परळीला आला नाही का. कोणतीही महिला कोणत्याही पुरुषाच्या, राजकारण्याच्या आधाराशिवाय मोठी होऊ शकत नाही का? तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावांचा वापर करणे बंद करावा.हे वागणं महाराष्ट्रातील राजकारण्यांना शोभत नाही. इतक्या कुस्थितपणे आमची खिल्ली उडवली आणि हशा पिकवला,त्यांनी आमची जाहीर माफी मागावी. याबाबत मी महिला आयोगाकडे (Commission for Women) तक्रार केली असून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार”, असल्याचेही प्राजक्ताने म्हटले.