मुंबई । Mumbai
छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वाद उसळला आहे. हिंदुत्ववादी संघटनांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांची मागणी कबर हटवण्याची आहे. अशातच हा वाद आणखी पेटला असून नागपूर शहरातील महाल परिसरात हिंसाचार झालाय. दोन गटांत झालेल्या दंगलीमुळे शहरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा करताना गंभीर आरोप करत केले आहेत.
“महाराष्ट्र सरकारमधील एक विषारी मंत्री दररोज समाजात द्वेष पसरवण्याचं आणि विभाजन करण्याचं काम करत आहे. महाराष्ट्रात दोन समाजात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरूनही लोक आणले जात आहे. हा एका मोठ्या कटाचा भाग आहे,” असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांचं नाव न घेता केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागले .सोमवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला .यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली .जमा व पांगवण्यासाठी गेलेल्या कर्तव्यपथावरील पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकातील अनेकांना जबर मार बसला .यात तीन पोलीस आयुक्तांसह शेकडो पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत . आता या संपूर्ण भागात जमावबंदी व संचारबंदी लावण्यात आली आहे .