नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सकारात्मक राजकारण करण्याचा सल्ला दिला. विरोधकांनी त्यांच्या पराभूत मानसिकतेवर मात करावी. संसद हे महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्याचे ठिकाण आहे आणि नाटकं करण्यासाठी इतरही ठिकाणे आहेत. त्यावर वायनाडमधील काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी तीव्र शब्दांत टीका केली.
सोमवारी सकाळी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात अपेक्षेप्रमाणेच वादळी झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी जोरदार गदारोळ केला. लोकसभेचे कामकाज शून्य प्रहरात सुरू होताच, एसआयआर आणि प्रदूषण यांसारख्या तातडीच्या आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याच्या मागणीवरून विरोधकांनी प्रचंड गोंधळ सुरू केला. लोकसभा अध्यक्षांनी शांतता राखण्याचे आवाहन करूनही गदारोळ थांबला नाही, त्यामुळे अखेर कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना उद्देशून मोठे विधान केले होते. ते म्हणाले होते की, संसदेत ‘ड्रामा नाही, डिलिव्हरी’ झाली पाहिजे. यावर काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी जोरदार प्रतिक्रिया देत पलटवार केला.
पंतप्रधान मोदींवर पलटवार करत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या की, महागाई, प्रदुषण या सारख्या जनतेशी थेट संबंध असलेल्या मुद्यांपासून सत्ताधारी पळ काढत आहेत. या मुद्यांवर चर्चा नको म्हणून पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांचा खरा ड्रामा सुरु आहे.
जनतेच्या प्रश्नांवर लोकशाही मार्गाने चर्चा न करणे खरा ड्रामा आहे
माध्यमांसोबत संवाद साधताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, संसदेत जनतेच्या प्रश्नावर बोलणे म्हणजे ड्रामा नाही. निवडणुकीच्या काळात एसआयआर, प्रदुषण हे मुद्दे आहेत. संसद कशासाठी असते, यावरच आज चर्चा करु या! असे म्हणत खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या, जनतेचे प्रश्न उपस्थित करणे, मुद्दे उपस्थित करणे ड्रामा नाही. मुद्यांच्या विषयांवर बोलण्यास परवानगी न देणं, चर्चा न करणे ड्रामा आहे. जनतेच्या प्रश्नांवर लोकशाही मार्गाने चर्चा न करणे खरा ड्रामा आहे, असा जोरदार पलटवार त्यांनी केला.
मोदी काय म्हणाले होते?
पंतप्रधान मोदींनी सर्व पक्षांना, विशेषतः विरोधी पक्षांना अधिवेशन सुरळीत आणि सन्मानजनकपणे चालवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी स्पष्ट केले की, ड्रामा करण्यासाठी संसदेबाहेर अनेक जागा आहेत, पण सभागृहात गोंधळाला जागा नाही. यावर काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर ढोंगीपणाकरत असल्याचा आरोप केला. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी , पंतप्रधान स्वतः कधी संसदेत उपस्थित नसतात किंवा विरोधकांशी संवाद साधत नाहीत. संसद सुरळीत न चालल्यास संपूर्ण दोष पंतप्रधानांचा आहे, कारण ते अत्यावश्यक सार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास परवानगी देत नाहीत,” असे म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





