अहमदनगर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या माध्यमातून नगर शहराला अमृत भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी निधी वर्ग झाला आहे. डिसेंबर अखेर हे काम पूर्ण होणार आहे. दुसर्या टप्प्यातील नवीन प्रस्ताव मंजूरीसाठी केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी सांगितले.
यासाठी सभापती घुले यांनी मनपा प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पुणे येथील कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, सभागृह नेते रवींद्र बारस्कर, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक डॉ. सागर बोरूडे, मनोज दुलम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर. जी. सातपुते, सुमित कुलकर्णी, विनोद कुरणपट्टी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अर्जुन नाडगौडा आदी उपस्थित होते. भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून मैलमिश्रीत पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे सिना नदीत होणारे प्रदुषण थांबणार आहे.
यासाठी संपूर्ण शहरामध्ये अमृत भुयारी गटार योजनेचे काम मार्गी लागावे, यासाठी पाऊले उचलली आहेत. उर्वरित नगर शहराच्या उपनगरामध्ये या योजनेच्या कामाला निधी प्राप्त होण्यासाठी कागदपत्राची जुळवा जुळव करून केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार आहे. दुसर्या टप्प्यातील उर्वरित निधी प्राप्त झाल्यानंतर या कामाला गती दिली जाईल. यामध्ये केडगाव, सावेडी उपनगर, कल्याण रोड उपनगर, नागापूर, बोल्हेगाव, निर्मलनगर परिसरातील भुयारी गटर योजनेची कामे मार्गी लागणार आहे.
………………..