मुंबई | Mumbai
मनोज जरांगे यांनी गेल्या पाच दिवसांपासून सुरू केलेल्या उपोषणाला अखेर यश आले आणि सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत जीआर काढले. ५ दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसलेल्या आणि राज्यभरात आरक्षण आंदोलनाकडे लक्ष असलेल्या मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला. राज्य सरकारने आपल्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. उर्वरित मागण्या या पुढील कालावधीत पूर्ण होतील. त्यामुळे आपण मराठा आरक्षणाची लढाई जिंकलो आहोत, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले होते.
राज्य सरकारच्या नव्या जीआरमुळे मराठा आरक्षणाबाबत कोणताही फायदा होणार नाही, असे मत मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनी मांडले. यावर आता मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विनोद पाटलांच्या भुमिकेवर प्रतिक्रिया दिली तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना फटकारले आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, या सगळ्या निर्णयप्रक्रियेत दररोज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची चर्चा व्हायची. नव्या जीआरमुळे निर्माण होणारे कायदेशीर प्रश्न आणि पर्यायांबाबत आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करायचो. याबाबत सातत्याने आम्हाला त्यांचे मार्गदर्शन लाभले. सरकारने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. तर हे सगळे पुढे कसे जातील, याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आता सर्व मराठा विचारवंतांनी अंमलबजावणीत सहकार्य करावे, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले की, हा निर्णय एखाद्या विशिष्ट समाजासाठी वगैरे नाही. ब्रिटिशांच्या राजवटीत निजामशासित भाग सोडून जो भाग होता तिकडे नोंदी आहेत. 80 ते 90 टक्के शेती करणाऱ्यांना दाखले मिळाले. यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. कोणाचंही आरक्षण काढून घेण्यात आलेले नाही. सरकारची भूमिका ही न्याय देण्याची होती. सरकारने जीआर काढताना सूचना, हरकती मागवल्या नाहीत, याबाबत त्यांना विचारणा केली असता विखे-पाटील यांनी म्हटले की, याबाबत आपण न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत विचार घेतलं आहे, महाधिवक्त्यांचं मत घेतलं आहे. हा निर्णय घाईत झालेला नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी अनेक मराठा समाजाच्या लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरे तर या वेगवेगळ्य विचार प्रवाहांमुळे मराठा आरक्षणाचा संघर्ष कमकुवत झाला होता. इतकी वर्षे वेगवेगळे मतप्रवाह ठेवून आपल्याला आरक्षणाच्या लढाईत यश मिळाले का? नाही मिळाले, कायम अपयश पदरात पडले. आता निदान मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण असून सरकारच्या इच्छाशक्तीमुळे ते सर्वोच्च न्यायालयायतही टिकले आहे. त्यामुळे मराठा विचारवंतांनी टीका करण्यापेक्षा काही दिवस शांत बसावे. मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करुन हे यश मिळवले. आता सर्व मराठा विचारवंतांनी अंमलबजावणीत सहकार्य करावे, असा सल्ला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला.
लक्ष्मण हाकेंनी लुडबूड करु नये
लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या नव्या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचे संकेत दिले. याबाबत बोलताना विखे-पाटील यांनी म्हटले की, लक्ष्मण हाके अन्य लोकांच्या आरक्षणात कशाला लुडबूड करतात. ज्यांचे आरक्षण आहे त्यांना ते मिळणारच आहे. कोणीह ओबीसींचे आरक्षण काढून घेत नाही. मराठा उपसमितीला काहीच कळत नाही, असे नाही. आपल्यालाच जास्त कळते, असा अतिशहापणा लक्ष्मण हाके यांनी करु नये, असा टोलाही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




