श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील नेत्यांची सत्ताधारी पक्षात जाण्याची स्पर्धा पूर्ण होत आली असून प्रमुख नेत्यांपैकी माजी आमदार राहुल जगताप आणि नागवडे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बुधवारी (दि.28) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. जगताप-नागवडे हे पाचपुते विरोधक पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
यापूर्वी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. तालुक्याचे राजकारण पाहता पाचपुते यांना सक्षम विरोधी पर्याय असणे नेत्यांना गरजेचे असल्याने अनेकांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी या उद्देशाने नेत्यांनी सत्ताधारी पक्षात नेत्यांनी प्रवेश केला आहे.
दरम्यान, मंगळवारी (दि. 27) राहुल जगताप व राजेंद्र नागवडे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या स्वतंत्रपणे दोघांच्याही भेटी घेतल्या. त्यानंतर तटकरे यांच्या उपस्थितीत जगताप व नागवडे यांची एकत्रित बैठक झाली. त्यानंतर जगताप व नागवडे दोघांनीही एकत्रितपणे काम करण्यास होकार दिला. त्यानुसार त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले व बुधवारी दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राजेंद्र नागवडे राष्ट्रवादीमध्ये होते. मात्र विधानसभा निवडणूकीत तिकीट न मिळाल्याने ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले पण निवडणुकीतील पराभवानंतर ते शिवसेनेत रमले नाहीत. त्यांना सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी सत्ताधारी पक्षात असणे गरजेचे असल्याने त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँगेसमध्ये प्रवेश केला. अशीच राजकीय परिस्थिती माजी आमदार राहुल जगताप यांची होती. त्यांनी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीत बोलावणे येऊनही जाणतेराजे खासदार शरद पवार यांची साथ सोडली नव्हती पण कुकडी कारखान्यासह त्यांच्या इतर अडचणी सुटल्या नाहीत, कारखाना बंद राहिला निदान आता पुढचा गळीत हंगाम तरी सुरळीत व्हावा यासाठी राहुल जगताप यांनी हा प्रवेश केला आहे.