शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे नवीन सक्षम, विश्वासू तसेच जनतेच्या मनातील सरकार स्थापन होण्याकरिता मी साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशीनबाबत संशय घेतला जात असून ते पराभव पचवू शकत नाही म्हणून असे आरोप करत आहे. त्यांचा हा रडीचा डाव आहे. 5 डिसेंबर रोजी महायुतीचे नवीन सरकार स्थापन होत असल्याचे विधानसभेचे मावळते सभापती राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
शनिवारी राहुल नार्वेकर यांनी साई समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांची संवाद साधताना ते म्हणाले, यापूर्वीही 2004 मध्ये बहुमत मिळूनही सरकार स्थापन करण्यासाठी विलंब झाला होता. त्यामुळे हे साहजिक असून आम्ही 5 डिसेंबरपर्यंत चांगले आणि जनतेच्या मनातील नवीन सरकार स्थापन करू. सध्या अनेक विरोधी पक्षाचे नेते म्हणतात की निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायला हव्या होत्या. विरोधकांचा व महाविकास आघाडीच्या नेत्यांचा संवैधानिक संस्था अर्थात सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय तसेच निवडणूक आयोग यांच्यावर विश्वास नाही का? ते बेजबाबदारपणे या सर्व संस्थांवर टीका करत आहेत. म्हणून त्यांना भारताच्या संविधानावर किती विश्वास आहे, हे समजून येते. स्वतःचे अपयशावर आत्मचिंतन करण्यापेक्षा नवीन सरकार कधी स्थापन होईल, कोण मुख्यमंत्री होणार याचीच चिंता त्यांना अधिक दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला.
नवीन सरकारमध्ये विरोधी पक्षनेता नसेल यावर बोलताना ते म्हणाले, यावर काही नियम आहे. त्यानुसारच हे होईल. संजय राऊत यांनी भाजप हा विषारी साप असून तो डंख मारल्याशिवाय राहणार नाही.असे वक्तव्य केले होते, यावर उत्तर देताना नार्वेकर म्हणाले, खरं तर उबाठा शिवसेनेला कळायला हवे की त्यांच्यामध्ये अस्तीनचा साप कोण आहे. कुणामुळे तुमच्या पक्षाची अधोगती झाली, असा टोला संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. सध्या नवीन सरकारमध्ये एक व दोन क्रमांकाच्या पदासाठी रस्सीखेच सुरू आहे या प्रश्नांवर ते म्हणाले, असे कोणतेही एक, दोन किंवा तीन क्रमांकाचे पद नसतात. अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांच्यावर मेहरबानी करून भाजपने मुख्यमंत्रीपद दिले.
या राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत ‘कोल्ह्याला द्राक्ष आंबटच’ लागतात, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. सध्या केंद्रीय वरिष्ठ नेते नवीन सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासोबत चर्चा करत असून या सर्वांनी केंद्रातील नेतृत्वावर विश्वास ठेऊन 5 डिसेंबर पर्यंत सक्षम, विश्वासू, सर्वांना सोबत घेऊन चालणारे असे चांगले सरकार स्थापन होईल, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला.