राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कडधान्य सुधार प्रकल्प व भारतीय कडधान्य संशोधन संस्था कानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 28 वी वार्षिक रब्बी कडधान्य बैठक 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत विद्यापीठात आयोजीत करण्यात आली आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. टी.आर. शर्मा उपस्थित राहणार आहेत. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील अध्यक्षस्थानी असणार आहे. याप्रसंगी सहाय्यक महासंचालक (कडधान्य व तेलबिया) डॉ. संजीव गुप्ता, कानपूर येथील भारतीय कडधान्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ. जी.पी. दिक्षीत, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार आणि कानपूर येथील प्रकल्प समन्वयक डॉ. शैलेश त्रिपाठी तसेच इक्रिसॅट व इकाड्रा आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.
सदर बैठकीस रब्बी कडधान्य पिकांवर संशोधन करणारे देशभरातील विविध राज्यांतून जवळपास 150 शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.
बैठकीदरम्यान विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले असून यात मागील वर्षी हरभरा, मसूर, वाटाणा आणि लाखोळी या रब्बी कडधान्य पिकांवरील झालेल्या संशोधनाचा आढावा घेण्यात येऊन पुढील संशोधनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. तसेच या रब्बी कडधान्य पिकांचे नविन वाण शिफारशीत करण्यात येतील अशी माहिती वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजू अमोलिक आणि प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी दिली.