Friday, September 20, 2024
Homeनगरपाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत; केलेली पेरणी वाया जाण्याची भीती

पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत; केलेली पेरणी वाया जाण्याची भीती

राहुरी । प्रतिनिधी

- Advertisement -

पाऊस लांबल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून थोड्याफार पावसावर पेरणी केलेली पिके सुकून चालल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे ढग दाटू लागले असल्याचे चित्र सध्या राहुरी तालुक्यात दिसत आहे.

मागिल महिन्यात तालुक्यात काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला. आता पाऊस पडता झाल्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर, मका आदी पिकांच्या पेरण्या व लागवडी केल्या. मात्र, त्यानंतर आज जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने दडी मारल्याने चांगली उगवून आलेली पिके पावसाअभावी सुकून चालली आहेत.

हे देखील वाचा : मुसळधार पावसाचा फटका आमदार आणि मंत्र्यांनाही; मंत्री अनिल पाटील, मिटकरी ट्रॅकवर

यंदा भरपूर पावसाचा अंदाज हवामान तज्ञांनी दिल्याने शेतकरी वर्गाने शेतीत कोट्यवधी रुपयांचा जुगार मातीत खेळला. परंतु, हवामान तज्ञांनी दिलेला पावसाच्या अंदाजा प्रमाणे पाऊस झाला नसल्याने शेतकरीवर्गाची चिंता वाढली आहे. सध्या वातावरणात उकाडा कायम असून पाऊस कधी येणार यांची चिंता आता शेतकऱ्यांसह सर्वांनाच वाटू लागली आहे.

खरीप पिकांवर शेतकरीवर्गाचे वर्षाचे अर्थचक्र अवलंबून असते. मात्र, वेळेवर पाऊस झाला नाही तर, शेतकरी आर्थिक चक्रव्युहात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दक्षिण नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दडी मारल्याने चिंतेत भर पडली होती.

हे देखील वाचा : नाशिकमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हिट अ‍ॅण्ड रन 

मात्र, गेल्या दोन दिवसात पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात झाल्याने मुळाधरणात नविन पाण्याची आवक सुरू झाली. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला तर मुळाधरणाच्या पाणी पातळी वाढ होऊन काहिसी चिंता दूर होईल.

यावर्षी हवामान तज्ञांनी दिलेल्या भरपूर पावसाच्या अंदाजामुळे शेतकरीवर्गाने महागडी बि-बियाणे, खते, औषधांची खरेदी करून ठेवली आहे. परंतु, पावसाचे कोणतेही वातावरण दिसत नसल्याने आपली फसवणूक तर झाली नाही ना? अशी शंका आता शेतकऱ्यांना येऊ लागली आहे. काही शेतकऱ्यांच्या मते, शेतीसाठी लागणारे बि-बियाणे, खते, औषधे बनविणाऱ्या कंपन्या व हवामान तज्ञ यांची मिलीभगत असून यांनी मिळून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे.

पावसाचा अंदाज देऊनही पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामाचे भवितव्य धूसर बनले आहे. कोवळी पिके शेतात डोलत असतानाच पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. येत्या दोन-चार दिवसांत पाऊस झाला नाही तर खरिपासाठी बळीराजाने केलेला खर्च मातीत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या