राहुरी | बंडू म्हसे
यंदा राज्यात मान्सूनने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात उत्साह निर्माण झाला आहे. यावर्षी खरीप हंगामामध्ये राहुरी तालुक्यात सुमारे 27 हजार 400 हेक्टरवर विविध तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य व कापूस या पिकांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कृषि विभागाने पुरेसा खतसाठा, बियाणे आणि कृषी निविष्ठांच्या वितरणाचे बारकाईने निरीक्षण केले आहे. या हंगामात पाऊस वेळेवर पडणार असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
राहुरी तालुक्याचा भौगोलिकदृष्ट्या काही भाग बारामाही बागायती आहे, तर पश्चिमेकडील काही भाग कोरडवाहू आहे. बागायती भागामध्ये खरीप हंगामात कापूस, सोयाबिन, मका व भुईमूग, तर पठार व कोरडवाहू भागात बाजरी, मका, सोयाबिन, कांदा, मूग, तूर, उडीद अशी पिके घेतली जातात. मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे कपाशी पिकाची जवळपास 70 टक्के लागवड पूर्ण झाली आहे, आणि इतर पिकांची पेरणी अथवा लागवड करण्यासाठी शेतकरी शेतात वाफसा येण्याची वाट पाहत आहे. या हंगामात 20 जूनपर्यंत खरिपातील सर्व पेरण्या व लागवडी पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे.
या खरीप हंगामात शेतकर्यांना आवश्यक रासायनिक खते मिळण्यासाठी तालुका कृषि विभागाने सुमारे 15 हजार 863 मेट्रिक टन खताची मागणी केली आहे, आणि त्यापैकी 12 हजार 600 मेट्रिक टन खते तालुक्यासाठी उपलब्ध होणार आहे. सध्या तालुक्यात 6 हजार मेट्रिक टन खताचा साठा शिल्लक आहे. यामध्ये कृषि विभागाने यूरिया 6 हजार 98 मेट्रिक टन, डीएपी 1 हजार 682 मेट्रिक टन, म्युरिट ऑफ पोटॅश 1 हजार मेट्रिक टन, संयुक्त खते 4 हजार 983 मेट्रिक टन, सुपर फॉस्फेट 2 हजार 99 मेट्रिक टन अशी मागणी केली आहे. त्यापैकी राहुरी तालुक्याला यूरिया 4 हजार 822 मेट्रिक टन, डीएपी 936 मेट्रिक टन, पोटॅश 203 मेट्रिक टन, संयुक्त खते 4,937 मेट्रिक टन, सुपर फॉस्फेट 1,706 मेट्रिक टन, तसेच टंचाई काळात युरियाचा ‘बफर साठा’ म्हणून 177 मेट्रिक टन यूरिया उपलब्ध होणार आहे.
त्यानुसार, या हंगामात लागणार्या सर्व पिकांच्या बियाणाचे उच्च प्रतीचे वाण तालुक्यातील बाजारपेठेत मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहेत. तसेच खते, बियाणे यांचा काळाबाजार व साठेबाजीवर लक्ष ठेवण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वात एक भरारी पथक तयार केले आहे, ज्यामध्ये पंचायत समितीचे कृषी अधिकारी, वजने-मापे निरीक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. या पथकाने चालू हंगामात तालुक्यातील चार कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. जर तालुक्यात काही गैरप्रकार होत असतील, तर तक्रारदारांसाठी 1800-233400 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यासाठी गुणवत्ता नियंत्रण निविष्ठा, उपलब्धता व तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला आहे.
तसेच शेतकर्यांसाठी गावोगावी जाऊन बीजप्रक्रिया मोहिम राबवली जाणार आहे. हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळे, खरीप हंगामातील पीकनिहाय तंत्रज्ञान प्रशिक्षण, तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड (पेरू, आंबा, चिक्कू, डाळिंब व शेवगा) यासाठी तांत्रिक मान्यता, शेती शाळा नियोजन, घरगुती चाचणी पद्धतीने बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, क्रॉपसॅप, होर्टसॅप शेतकरी निवड आदींबाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी दिली.
राहुरी तालुक्यामध्ये यंदा खरिप हंगामासाठी मुबलक बियाणे व खतांचे नियोजन केले आहे. तसेच कुठल्याही प्रकारची टंचाई निर्माण होणार नाही, याची काळजी कृषी विभाग घेत आहे. शेतकर्यांनी ठराविकच वाणांचा आग्रह धरू नये, बाजारात उपलब्ध सर्वच वाण उच्च प्रतिचे आहे. टंचाई काळात युरिया (177 टन) बफर साठ्याचे नियोजन असून निविष्ठा बाबत काही तक्रार असल्यास शेतकर्यांनी तालुका कृषी अधिकार्यांशी संपर्क साधावा.
– बापूसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी, राहुरी