मुंबई | Mumbai
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण राबवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर सरकारने आपली भूमिका मागे घेतली आणि जीआर रद्द केला. ५ जुलैला सरकारच्या हिंदी सक्तीविरोधात मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, शासन निर्णय मागे घेण्यात आल्यानंतर आता विजयी मेळावा पार पडणार आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. याचदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच एकत्र आवाहन केले आहे.
काय म्हंटले आहे पत्रात?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘जय महाराष्ट्र’ अशी दोन ओळीची कॅप्शन देत हे पत्र आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन शेअर केले आहे. हे पत्र सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. ‘आवाज मराठीचा!’ या मथळ्याखाली ठाकरे बंधुंनी हे पत्र जारी केले आहे.
वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे सर्वांना आमंत्रित केले आहे. सोशल मीडियावर एकत्र पोस्ट करत दोन्ही नेत्यांनी वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या, असे आवाहन केलेय. त्यामुळे आता पाच जुलै रोजी राज्याच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत मिळताना दिसत आहेत.
जशास तशी पोस्ट
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एक पत्रक काढत सर्वांना एक महत्वाचे आवाहन केले आहे. आवाज मराठीचा…असे म्हणत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवले का? तर हो नमवले…, कोणी नमवले तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवले…आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या…आम्ही वाट बघतोय…, असे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. विशेष म्हणजे या पत्रकाच्या शेवटी पहिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असे नावंही देण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या शत्रूंना आणि मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान आणि आवाज देणारी घडामोड! जागराला यावे, अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे. वरळी येथील डोम सभागृहात हा विजयोत्सव होणार असून या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात देखील मोठी खलबते सुरू असल्याचे पहायला मिळतेय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





