Tuesday, October 22, 2024
HomeराजकीयRaj Thackeray : "आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी…"; राज ठाकरेंकडून...

Raj Thackeray : “आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी…”; राज ठाकरेंकडून टोलमाफीचे चिमटे काढून स्वागत

मुंबई । Mumbai

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

राज ठाकरे काय म्हणाले?

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा खूप खूप अभिनंदन.

टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला… आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही.

पण असो… किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी.

आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले.

महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका.
पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन.

कोणत्या पाच टोलनाक्यावर टोलमाफी?

आनंदनगर टोलनाका
दहिसर टोलनाका
मुलुंड-एलबीएस टोलनाका
वाशी टोलनाका
ऐरोली टोलनाका

दरम्यान मुंबईतील टोल माफीचा मोठा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. जवळपास पाच हजार कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. मुंबईतील पाच टोलनाक्यावरील टोलमाफीचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारला जवळपास पाच हजार कोटी रुपये संबंधित कंत्राटदाराना द्यावा लागणार आहे. पाच टोलपैकी चार टोलची मुदत २०२७ पर्यंत आहे तर एक टोल २०२९ पर्यंत आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या सर्व हलक्या वाहनांना टोल वसुली मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी लोकप्रिय घोषणा आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या