मुंबई | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना निवडणुकीचा ‘राज’मंत्र दिला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी त्यांना मुंबई ताब्यात घ्यायची आहे. मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा असे वक्तव्य केले. मुंबईत मनसेच्या मेळाव्यात पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबईत जिंकायचीच आहे, असे ठणकावून सांगितले.
यंदाची निवडणूक ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे हे संकट ओळखा. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायची आहे. त्यामुळे सगळे मतभेद बाजुला सारुन निवडणुकीत झोकून देऊन काम करा, असा कानमंत्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिला. मनसेकडून अद्याप आपल्या एकही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मनसेने आपल्या उमेदवारांना परस्पर एबी फॉर्म देऊन त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज ठाकरे नेमके काय म्हणाले?
कुणाला किती जागा मिळाल्या, यामुळे नाराज होऊ नका. स्वार्थ मराठी माणसाच्या हितापुढे शुल्लक आहे. कुणाच्या व्यक्तिक स्वार्थाकडे पाहू नका. मुंबई वाचवण्याची जबाबदारी आहे. दुसऱ्यांचे स्वप्न गाडण्यासाठी एकत्र व्हा, असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले. काही लोकांना मुंबई हातात घ्यायची आहे. त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त करणे, हा आपला उद्देश आहे. इतकी वर्षे आपण सत्तेविना राहिलो पण आपल्या पक्षाचा दबदबा कमी झालेला नाही. आज भाजपकडे नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम आहे, या जीवावर ते माज करत आहेत. अशाप्रकारे सत्तेविना राहण्याचे प्रसंग देशाच्या इतिहासात अनेकदा आले आहेत. अनेकांना वाटते की भाजपमध्ये गेले तर फायदा होईल. पण भाजपमधील लोकांवर टांगती तलवार आहे. ही सगळी बसवलेली माणसे आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
निवडणुकीच्या प्रचारसभेत मी अनेक गोष्टी काढणार आहे. कोणाला किती जागा मिळाल्या, यामुळे नाराज होऊ नका. मराठी माणसाच्या हितापुढे वैयक्तिक स्वार्थ क्षुल्लक आहे. मुंबई वाचवायची जबाबदारी आपली आहे. आज-उद्या उमेदवारी अर्ज भरले जातील, तेव्हा सगळ्यांनी जल्लोष करा. आपल्याला युतीचा धर्म पाळायचा आहे. रात्र वैऱ्याची आहे. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मुंबई हातात राखायची आहे, असे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना सांगितले.
बाळा नांदगावकर काय म्हणाले?
बाळा नांदगावकर यांनी मनसेने अजून AB फॉर्म वाटले नसल्याबद्दल सांगितले की, आजपासून AB फॉर्म वाटले जातील. आज साहेबांपुढे यादी जाईल त्यानंतर राजगड कार्यालयातून नितीन सरदेसाई शिरीश सावंत हे AB फॉर्मचे वाटप करणार आहेत अशी माहिती दिली.
“मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे. मुंबई वेगळी करण्याची स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्न उद्धवस्त करा. मुंबई मराठी माणसाची, महाराष्ट्राची आहे. भांडणापेक्षा आणि वादापेक्षा आपल्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे. निवडणूक जोशात लढवायची आहे. मुंबई आपल्याला सत्ता राखायची आहे. सीट इकडून तिकडे होतात. मागच्या २० वर्षांमध्ये पहिल्यांदा आपण युतीमध्ये निवडणूक लढतोय. युती धर्म पाळायचा आहे“ असे बाळा नांदगावकर म्हणाले.




