मुंबई | Mumbai
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगावमधील जवळपास सगळ्याच शेत जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. वक्फ बोर्डाने कथित दावा केलेली शेतजमीन ही १०३ शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. गावातील एकूण शेतजमीनीपैकी जवळपास ७५% शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे. यामुळे १०३ शेतकऱ्यांचे जगणेच धोक्यात आले आहे. आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही असे जरी राज्य सरकारने सांगितले असले तरी हे पुरेसे नाही. आता या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला पाठिंबा देताना केंद्र सरकार विरोधकांच्या विरोधाला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.
राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलेय की, काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारे विधेयक केंद्र सरकारने सादर केले होते, त्यावर मुस्लिमधार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला आणि त्यामुळे हे विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवले गेले. या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती, हे वेगळे सांगायला नको. पण मुळात सुधारणा म्हणजे नक्की काय आहेत हे थोडक्यात समजून घेऊया असे त्यांनी सांगितले.
१) एखादी मालमत्ता वक्फ बोर्डाची आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार काढून घेतला जाणार आहे; वक्फ बोर्डाची जी मनमानी सुरु आहे त्यावरून हे किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल. २) एखादी मालमत्ता वक्फ प्रॉपर्टी आहे का सरकारी जमीन आहे याचा निवडा पूर्वी वक्फ ट्रिब्युनलकडून केला जायचा आणि त्यात जागोजागी अतिक्रमणे केली गेली आहेत. हे नवीन विधेयक जर मंजूर झाले तर जिल्हाधिकारी हा यापुढे निवाडा करेल ३) वक्फ बोर्डावर मुस्लिम महिलांचा समावेश असला पाहिजे आणि तसेच मुस्लिमेतर समाजाचे पण प्रतिनिधित्व असले पाहिजे ४) आणि कुठल्याही वक्फ बोर्डाच्या कारभाराचे ऑडिट करण्याचा अधिकार कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरलला राहील ५) आणि यापुढे एखाद्या व्यक्तीला त्याची संपत्ती वक्फ बोर्डाला द्यायची असेल तर त्याला पूर्वीसारखे बोली करार नाही तर लेखी करार करावा लागेल, ज्याने त्याला कायदेशीर चौकट मिळेल.
या सुधारणांमध्ये विरोध करण्यासारखं काहीही नसल्याचे राज यांनी म्हटले. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात 370 कलम हटवणे, तिहेरी तलाकवर बंदी आणणे, राम मंदिर उभारणी अशी पावले उचलली होती. ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान होता. त्यातूनच आम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना पाठींबा दिला होता असे राज यांनी सांगितले. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता, शक्यतो संसदेच्या या अधिवेशनातच हे विधेयक मंजूर करून घ्यावे.अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे पहावे असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
दरम्यान, यानिमित्ताने देशातील एकूणच वक्फ बोर्डांना पण एका गोष्टीची जाणीव मला आज करून द्यायची आहे ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी ‘भूदान चळवळ’ सुरु केली जिच्यात लाखो एकर जमीन देशातील हिंदूंनी सरकारला परत केली होती जेणेकरून भूमिहिनांना कसण्यासाठी जमीन मिळेल. हा जसा भूमिहिनांसाठी केलेला त्याग होता तसाच तो देशासाठी केलेला त्याग पण होता. असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा वक्फ बोर्डानी पण दाखवावा. सतत कुठे ना कुठे लोकांच्या जमिनीवर ताबा सांगायचा यापेक्षा वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यातील जमिनी सरकारला परत करून स्वतःच राष्ट्रीयत्व दाखवून द्यावे असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.