राजूर |वार्ताहर| Rajur
अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळच्या साथीने रौद्र रूप घेतले असून दुसर्या रुग्णाचा बळी घेतला आहे. मिसबाह इलियास शेख (वय13) या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे गाव भयभीत झाले असून, आत्तापर्यंत काविळग्रस्त रुग्णांची संख्या 350 च्या वर पोहोचली आहे. माजी आमदार वैभव पिचड यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे, गटविकास अधिकारी अमर माने, सहाय्यक गटविकास अधिकारी मुठे, विस्तार अधिकारी गायकवाड यांच्या समवेत तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता योग्य त्या उपाययोजना करून गावातील आरोग्याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना देऊन यात हलगर्जीपणा झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा दिला.
दरम्यान, काविळसारखी साथ पसरून दोन निष्पाप जीव गेले तरी प्रशासन जागे होत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. वेळेत पावले उचलली असती तर हे जीव वाचू शकले असते. आता गावच्या आरोग्यावर गदा येणार्या प्रत्येक यंत्रणेची जबाबदारी निश्चित करावी लागेल, असे पिचड यांनी सांगितले. त्यांनी मृत्यू पावलेल्या मुलीच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांसमवेत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत स्वच्छता, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनातील त्रुटींकडे लक्ष वेधले. त्यातच उपसरपंच संतोष बनसोडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथून शास्त्रज्ञांचे पथक काल राजूरमध्ये दाखल झाले. या पथकामध्ये डॉ. शिल्पा तोमर (शास्त्रज्ञ), डॉ. जावडेकर, डॉ. नारायण वायबसे, डॉ. नागोजी चव्हाण आणि डॉ. कुणाल पिसे यांचा समावेश आहे. या तज्ज्ञांनी गावातील पाणी व सांडपाण्याचे नमुने घेतले असून, विषाणू संसर्गाचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनीही गावात भेट देऊन आरोग्य केंद्र, जलस्रोत आणि बाधित भागांची सविस्तर पाहणी केली.एनआयव्हीची टीम लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार असून, त्यानुसार पुढील उपाययोजना राबवली जाणार आहेत.
दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने वैद्यकीय शिबिरे, जलस्रोताचे निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता मोहिमा राबवण्याची मागणी केली आहे. राजूरसारख्या मोठ्या गावात काविळीमुळे मृत्यू होणे ही फक्त वैद्यकीय नव्हे, तर प्रशासकीय व नियोजनातील गंभीर चूक असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे, असे शेवटी वैभव पिचड म्हणाले.
शुद्ध पाण्याची ग्रामस्थांची मागणी…
दूषित पाणी आणि त्यामुळे झालेल्या काविळीचा प्रादुर्भाव यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असल्याने सर्वांचा कल पाणी बाटलीकडे वाढला आहे. प्रत्येकजण पाण्याची बाटली विकत घेऊन तीव्र उन्हाळ्यात तहान भागवत असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली आहे. मात्र असे असले तरी हे सर्वसामान्य ग्रामस्थांना परवडणारे नसल्याने ग्रामपंचायतने शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.