मुंबई | Mumbai
राज्यसभेच्या सहा जागांसाठी (Rajya Sabha Election 2022) मतदानाला सुरवात झाली आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मतदान सुरु असताना महाविकास आघाडीला (MVA Govt) मोठा धक्का बसला आहे. ज्यसभेच्या मतदानाला उपस्थित राहण्यासाठी मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. न्यायालयाने नवाब मलिकांना मतदान करण्यास परवानगी नाकारली आहे.
दरम्यान नवाब मलिकांना याचिकेत सुधारणा करून पुन्हा दाद मागण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका मलिकांच्या वतीने करण्यात येणार आहे.